हजारो स्थलांतरितांची दिल्ली-युपी सीमेवर गर्दी
नवी दिल्ली – दिल्लीच्या परिसरात रोजंदारीवर कामाला असलेले हजारो मजूर आहेत. आता देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे मजूर आपल्या कुटुंबांसह उत्तरप्रदेश आणि बिहार या आपल्या राज्यातील मूळ गावा पायी परतत असल्याचा भीषण प्रकार सध्या सुरू आहे. तथापि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मजुरांना दिल्ली सोडून जाऊ नका असे आवाहन केले आहे.
त्याचवेळी पायी गावी परत जाणाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी दिल्ली परिवहन सेवेच्या बसेसही मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. केजरीवालांनी आज केलेल्या आवहनामध्ये म्हटले आहे की, या मजुरांनी स्थलांतर करण्याची गरज नाही त्यांनी आहे त्या ठिकाणीच राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी आम्हीं राहण्या जेवण्याची सोय केली आहे. मजुरांनी गर्दी करून आपल्या घरी जाण्याचा आग्रह धरला तर लॉकडाऊनचा हेतूच साध्य होणार नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवर हजारो मजुरांची सध्या गर्दी झालेली दिसून येत असून त्यांच्यासाठी उत्तरप्रदेश परिवहन आणि दिल्ली परिवहन या दोन्ही संस्थांची बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने त्यांच्यासाठी शंभर बसेस उपलब्ध करून दिल्या असून उत्तरप्रदेश सरकारने दोनशे बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा मजुरांसाठी दिल्ली सरकारने नाईट शेल्टरसह दिल्ली शहरातील शाळांच्या इमारतीही उघड्या करून देण्याची तयारी दाखवली आहे. दिल्लीत सध्या चार लाख लोकांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जात आहे. तथापि लॉकडाऊन मुळे असंख्य मजुरांची रोजीरोटी बुडाली असल्याने त्यांना गावाकडे परतण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यांच्या रोजगाराची संधी कोण उपलब्ध करून देणार हा त्यांच्यापुढील मोठा प्रश्न आहे.