भाग 3
कारगीलमध्ये आम्ही पहिला मुक्काम करायचे ठरविले होते. त्याप्रमाणे आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. पुढे द्रासपर्यंत पोचता पोचता देखील मधे मधे अडथळे येणं चालूच होतं. पण अर्थातच जीवावर बेतण्यासारख्या परिस्थितीत अडकण्याचे प्रसंग आले नाहीत.
द्रासजवळ जगप्रसिद्ध टोलोलिंगचा डोंगर लागतो जिथे पाकिस्तानने आपला तळ काबीज करण्यासाठी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांचे मोठे स्मारक बांधले आहे. ते “कारगिल वॉर मेमोरियल’ म्हणून ओळखले जाते. शहीद झालेल्या सैनिकांची स्मारके पाहून डोळे पाणावले. प्रचंड थंडी असताना प्राणाची शर्थ लावून, आपला जीव गेला तरी बेहत्तर असा निर्धार करून शत्रूवर मात करणं ही सोपी गोष्ट नाही. अशा सैनिकांचे स्मरण तिथे आलेल्या प्रवाशांना हे “वॉर मेमोरियल’ करून देते. तिथे येणारा प्रत्येक जण येताना एक पर्यटक म्हणून येतो पण निघताना मात्र एक देशभक्त म्हणून सद्गदित होऊन बाहेर पडतो हे नक्की.
“वॉर मेमोरियला’ सलामी देऊन आम्ही लवकरात लवकर कारगिल गाठायचे ठरवले. द्रास अजून आले नव्हते, पण आता सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यात आसपास कुठे काहीच दिसत नव्हते. शेवटी जवळच एक आर्मीचा तळ दिसला आणि आम्ही आत गेलो. साधारण दोन-अडीच वाजले असतील. तिथल्या सगळ्यांची जेवण पण झाली होती पण मेजर साहेब फॅमिली बरोबर आलेत म्हणल्यावर त्यांनी आमच्यासाठी पटकन अंडा बुर्जी आणि पराठे बनवले. पटकन जेवण उरकून, फ्रेश होऊन आम्ही निघणार तेवढ्यात दीपाला अचानक चक्कर आली. तापमानात झालेल्या अचानक बदलामुळे तिचे बीपी थोडेसे कमी झाले होते. ताबडतोब तिला साखर दिली आणि दहा मिनिटे रेस्ट करून, तिला पूर्ण बरे वाटल्यावर आम्ही तिथल्या लोकांचे शतशः आभार मानून निघालो.
कारगीलला पोचण्यासाठी साधारण 60-65 किमी अंतर राहिले असतील पण असल्या खतरनाक रस्त्यांमुळे ते 100 किमी वाटले आणि वेळही खूप लागला. साधारण पाच वाजता आम्ही कारगिलला पोचलो. लवकरच अंधारून येईल अशी लक्षणे दिसू लागली होती. कारगीलमध्ये जास्त थांबू नका, असे आम्हाला आधीच सांगण्यात आले होते आणि तिथे पोचल्यावर तिथल्या माणसांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून लगेचच ते पटले. खरे तर पर्यटक म्हणून तुम्ही गेलेले असाल तर तुम्हाला असा अनुभव येईलच असे नाही, पण एकंदरीत हालचालींवरून, दिसण्यावरून सैन्यातले लोक त्यांना चटकन ओळखू येतात आणि त्यामुळे त्यांची कदाचित अशी प्रतिक्रिया असते.
अनोळखी, सुनसान रस्ता आणि नुकताच आठवडाभर पडून गेलेल्या पावसामुळे अक्राळ विक्राळ रूप धारण करून वाहणारी सिंधू नदी यामुळे वातावरणातली गंभीरता उगीचच वाढली. त्यात आम्हाला जिथे राहायचे होते ते ठिकाणही मिळेना. ज्या ऑफिसरचा नंबर दिला होता त्याचा नंबर काही केल्या लागेना. आजचा दिवसच एक आव्हान घेऊन उगवलाय याची पूर्ण खात्री पटली आणि काहीही करून सुरक्षित ठिकाणी पोचणे अत्यंत गरजेचे वाटू लागले. बरं स्थानिक लोकांना आर्मीविषयी आधीच चीड, त्यामुळे त्यांना काही विचारण्यात अर्थच नव्हता. एका पेट्रोल पंपापाशी आम्ही 2 वेळा घिरट्या घालून परत परत तिथेच पोचत होतो. शेवटी एकदाचा त्या ऑफिसरचा फोन लागला आणि डकाव डकाव करत आम्ही आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोचलो. संध्याकाळच्या वेळी “गेम्स ड्रेस’ म्हणजे ट्रॅकसूट मधल्या जवानाने म्हणजेच भैय्याने ऋषीला जोरात “जयहिंद साब’ म्हटले आणि ते ऐकून माझ्या जीवात जीव आला. आर्मीमध्ये जवानांशी आम्ही बायका “भैय्या’ म्हणून आणि ऑफिसर्सशी त्यांच्या रॅंकनुसार संबोधतो.
आमच्यासाठी हे भैय्या म्हणजे सख्ख्या भावापेक्षा कमी नसतात. कारण खरोखर ते अगदी तशीच आमची काळजी घेत असतात. त्यामुळे भैय्यांना पाहून मला खूप सुरक्षित वाटले. तिथे आमची योग्य ती खातीरदारी ठेवण्यात आलीच होती, पण एकंदरीत ज्या पद्धतीने आमचा दिवस गेला होता त्यामुळे जणू काही आपण अनेक वर्षांनी आपल्या घरच्यांना भेटतोय असं वाटलं. स्वतः सैन्यदलाचा एक भाग असलो तरी किती देणं लागतो आपण या संस्थेचं असं जाणवलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे करून, आमची आपुलकीने काळजी घेणाऱ्या आमच्या बांधवांचा निरोप घेऊन आम्ही लेहसाठी रवाना झालो
सफर
सायली वर्तक