भेंडा – गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या भेंडा गोंडेगाव सलाबतपुर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे, या मागणीसाठी भेंडा, गोंडेगाव, नजीक चिंचोली, गोंडेगावच्या महिला सरपंचासह ग्रामस्थांनी नेवासा- शेवगाव रस्त्यावर भेंडा बसस्थानक चौकात सोमवारी रास्तारोको आंदोलन केले. या रस्त्याच्या कामासाठी सरपंचांनी तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्याची दखल न घेतल्याने आक्रमक झालेल्या महिला सरपंचांनी भेंडा रास्तारोको आंदोलन केले.
आंदोलनात माजी आमदार पांडुरंग अभंग, काशिनाथ नवले, तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, हरिभाऊ नवले, बाळासाहेब गव्हाणे, शरद आरगडे, रामकृष्ण आठरे, अजित मुरकुटे, वैभव नवले, ज्ञानेश्वरच्या संचालिका रत्नमाला नवले, लताबाई मिसाळ, मीरा नवले, वैशाली शिंदे, रोहिणी निकम, उपसरपंच मंगल गोर्डे, शिलाबाई नवले, राणी आरगडे, मनीषा आरगडे, सविता आरगडे, नवसाबाई गजरे, माया गंगावणे, कलाबाई वायकर, नजीक चिंचोलीच्या सरपंच वनमाला चावरे, सौंदाळाच्या सरपंच प्रियंका आरगडे, गोंडेगाव-पिचडगावच्या सरपंच कविता शिरसाठ, बाभूळखेड्याच्या सरपंच अश्विनी औताडे आदि सहभागी झाले होते.
या रस्त्याला मंजूरी मिळून चार वर्षे पूर्ण झाली. कार्यारंभ आदेश दिला आहे. फक्त ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाई व बेजबाबदारपणामुळे आजपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. जो रस्ता झाला आहे. तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे.
रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गरोदर महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे.
अनेक वेळा अपघात होत आहेत, ग्रामस्थांना अनेक अडचणीत सामोर जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारुन संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.