फुरसुंगी -हडपसर-सासवड महामार्गावरील वाहतूक कोंडी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वत: गाडीतून उतरून सोडविली होती. त्यानंतर प्रशासनाची धावपळ झाली, अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. याशिवाय खासदार सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही निवेदन, पत्राद्वारे या मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याबाबत सूचना केली होती. परंतु, याकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्याने सुप्रियाताई गडकरी यांना पुन्हा सांगा, अशी मागणी परिसरातील गाव, वाड्यावस्त्यांवरून केली जाऊ लागली आहे.
हडपसर-सासवड पालखी मार्गाचे काम गेल कित्येक वर्ष रेंगाळले आहे. या मार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर तर यामार्गाच्या निर्णयांसाठी मोठा विलंब लागत आहे. महामार्ग रुंदिकरणाचे काम लालफितीत रखडल्याने जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. तुकाईदर्शन ते दिवेघाट दरम्यान प्रत्येक आठवड्याला अपघातात एक तरी बळी जात आहे. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
रूंदीकरणासह रस्ताही दुरुस्ती होत नाही. वाढत्या अतिक्रमणांकडेही पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तुकाईदर्शनपासून एसपी इन्फोसिटी, भेकराईनगर चौक, पॉवर हाऊस, उड्डाणपूल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा ते दिवेघाट दरम्यान सतत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांना रस्ता ओलांडणेही जिकीरीचे होत आहे.
फुरसुंगी उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडले, तर तासनतास वाहतूक कोंडी सुटत नाही. उड्डाणपुल संपताच कपड्यांची होलसेल दुकान आहेत. तेथे कपडे खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची वाहने रस्त्यावर लागलेली असतात, त्यामुळे येथे अपघातसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस प्रशासनही याकडे उघडपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे असा प्रकार झाल्याची भावना चालक व्यक्त करीत आहेत.