मुंबई: विधानसभेच्या निवडणूकीत भाजपने 1 कोटी 42 लाख मते मिळवत 105 आमदार निवडून आले आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या 119 आहे. आमच्याशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे, असं पाटील म्हणाले. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज दादर येथील वसंत स्मृती येथे भारतीय जनता पक्षाच्या ‘संघटन पर्व-२०१९’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र प्रदेशची संघटनात्मक निर्वाचन कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला उपस्थित भाजपचे खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत सवांद साधला.
पाटील म्हणाले, भाजपच्या कालपासून तीन बैठका झाल्या आहेत. विधानसभेत निवडून आलेले आमदार आणि अपक्ष आमदारांसोबत या बैठकांमध्ये चर्चा झाली. बूथ ते राष्ट्रीय अध्यक्षांची रचना यावर यात चर्चा झाली. तसेच आमची कोणाशीही चर्चा सुरू नाही, पण राज्यात आमच्याशिवाय स्थिर सरकार कोणी देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.