नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सोमवारी आम आदमी पक्षाच्या (आप) पंजाब शाखेने दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात निदर्शने केली. त्या निदर्शनांत सहभागी होत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली.
निदर्शनस्थळी बोलताना केजरीवाल यांनी कृषी कायद्यांना कडाडून विरोध दर्शवला. शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी देणारा कायदा देशात आणायला हवा. शेतकऱ्यांच्या लढ्यात संपूर्ण दिल्ली त्यांच्याबरोबर आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते.
मात्र, केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तो पक्ष आश्वासनाच्या अगदी उलट कृती करत आहे. एमएसपीची व्यवस्था रद्द करण्याची पाऊले उचलली जात आहेत. भाजपने देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कृषी विधेयके बनवणाऱ्या समितीमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याचाही समावेश होता. संबंधित कायद्यांबद्दल त्या नेत्याने भाजपचे अभिनंदन केले.
मात्र, कायदे बनल्यानंतर त्या पक्षाकडून विरोध केला जात आहे, अशी खिल्ली केजरीवाल यांनी नामोल्लेख टाळून उडवली. त्यांच्या निशाण्यावर कॉंग्रेस असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, केजरीवाल निदर्शनस्थळावरून निघून गेल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पंजाबमधील आपचे खासदार भगवंत मान आणि त्या पक्षाच्या 136 नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. करोना संकटामुळे निदर्शनांना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.