श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- तालुक्यातील टाकळीभान येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी दि.२४ रोजी शांततेत आंदोलन करण्यात आले. तरीही राजकीय आकसापोटी पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीरामपूर प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,आंदोलन करतेवेळी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तहसिलदार व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरूपात कळविलेले होते. तशी पोहोच तहसिलदार कार्यालय यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेली होती.यावेळी जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले असल्याबाबत कोणतीही परिपत्रक तहसिलदार व पोलीस प्रशासन यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेले नाही.
टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीबाबतचे जाहीर प्रकटन केलेले नाही. याउलट आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्ताची तजवीज प्रशासनाने केलेली होती. आंदोलन हे कायदेशीर व शांततेत सनदशीर मार्गाने होते. या ठिकाणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे संबधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते. शासनाच्या वतीने मंडळ अधिकारी हजर होते. त्यांनी निवेदन स्वीकारले.
तरीही, दि २५ रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला पोलीस हवालदार राजू त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. आंदोलनकर्त्यांना फिर्याद वाचल्यांनतर पहिल्यांदाच समजले की,नगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी दि. १७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत.
वास्तविक जमावबंदी आदेश असल्याबाबतची पूर्वकल्पना ही शासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाने अथवा शासकीय कार्यालयाने आंदोलन करू नये ,अशी कुठलीही नोटीस आजअखेर दिलेली नाही. वास्तविक पाहता सदरची फिर्याद ही राजकीय आकसापोटी केल्याचे निर्दशनास येत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दाखल केलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.