पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत केमोथेरेपी सेंटर उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एक शववाहिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण भागात उपचारादरम्यान रूग्ण मृत पावल्यास मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध होत नाही. मिळालीच तर ग्रामीण भागात सर्वसामान्याला परवडेलच असे दर नसतात. त्यामुळे नातेवाईकांची धावपळ आणि मृतदेहाची हेळसांड होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच राज्यासह देशात कर्करूग्णांचे प्रमाण वाढत असून, या आजाराचे उपचार घेणे गरीब व सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असून, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी खराब होणे अश्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामध्ये अनेकांना डायलसीसची वेळ येते. अशा परिस्थितीत डायलसीस करणारऱ्यांची संख्या अधिक आणि डायलसिस सेंटर कमी अशी परिस्थिती आहे. बहुतांश व्यक्तींना डायलसिसचा खर्च परवडण्यासारखा नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.