नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना आता मुख्यमंत्रिपदाची धूरा सोपवली जाणार का असा प्रश्न आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी यांना विचारण्यात आला. त्यावर थेट उत्तर देण्याऐवजी त्यांनी गोलमाल उत्तर दिले.
त्या म्हणाल्या सुनीता केजरीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आहेत. त्या आणि आम आदमी पक्षाच्या सर्वच नेत्यांचे कुटुंब या संघर्षात सहभागी राहीले आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शनपासून ते आपची स्थापना होईपर्यंत केजरीवाल यांचे माता-पिताही प्रत्येक संघर्षात सहभागी होते. आम्ही सगळेच संघर्ष करतो आहोत.
दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेच्या संदर्भात त्या म्हणाल्या चार अशा जबाबांच्या आधारे केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे की जे निरर्थक आहे. तसेच हे जबाब देण्याच्या अगोदर त्यांनी असे अनेक जबाब दिले आहेत की ते केजरीवाल यांना ओळखत नाहीत.
काही महिने तुरूंगात राहील्यावर ही मंडळी आपले जबाब फिरवतात. आज कोर्टात केजरीवाल यांनी आपली बाजू मांडत ईडीची केस उध्वस्त केली. ईडीचा खरा अर्थ एक्स्टॉर्शन डायरेक्टोरेट आहे हे त्यांनी सिध्द करून दाखवले. ईडीच्या तपासानंतर दारू घोटाळा झाला. दारूच्या व्यापाऱ्यांकडून खंडणी घेतली गेली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात ईडीने दिलेल्या क्लोजर रिपोर्टबद्दल आतिशी म्हणाल्या ईडी आणि सीबीआयचा वापर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात केला जातो आहे हे स्पष्ट आहे. विरोधी पक्षांच्या सगळ्याच नेत्यांच्या विरोधात एक एक गुन्हे दाखल केले जात आहेत.
जो भारतीय जनता पार्टीत जातो त्याच्यावरचे आरोप मागे घेतले जातात. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात असेच झाले. आमची फाइल हरवली आहे म्हणून आम्ही ही केस बंद करत आहोत असे तेंव्हा ईडीने म्हटले. जो भाजपमध्ये जाईल तो त्यांच्या वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ होऊन बाहेर येईल.