पुणे – एसटीच्या “शिवशाही’ बसेसद्वारे मिळणारा महसूल घटल्याने राज्यभरातील दहा मार्गांवरील या बसेस बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे, आणखी दहा मार्ग महामंडळाच्या रडारवर असून हे मार्ग बंद करण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे.
गेल्याच आठवड्यात यवतमाळ ते पुणे, पुणे ते यवतमाळ, उदगीर ते बोरिवली, बोरीवली ते उदगीर, लातूर ते मुंबई, मुंबई ते लातूर, चंद्रपूर ते औरगांबाद, औरंगाबाद ते चंद्रपूर, अक्कलकोट ते मुंबई, मुंबई ते अक्कलकोट, उमरगा ते बोरीवली, बोरीवली ते उमरगा, उस्मानाबाद ते मुंबई, मुंबई ते उस्मानाबाद, मेहकर ते मुंबई, मुंबई ते मेहकर, चोपडा ते पुणे, पुणे ते चोपडा, परळी ते मुंबई आणि मुंबई ते परळी असे दहा मार्ग बंद करण्यात आले आहेत. उर्वरित मार्गांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी दहा मार्ग बंद करण्याच्या संदर्भात महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली. दरम्यान, फायद्याच्या मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस आणि फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.
पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते बोरीवली आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. त्या तुलनेत अन्य मार्गावर जेमतेम उत्पन्न मिळत आहे, त्यानुसार अशा 20 मार्गांचे सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले असून हे मार्ग लवकरचा निश्चित करण्यात येणार आहेत, असेही देओल यांनी स्पष्ट केले.
——–