जम्मू – बॅंकांकडून कर्ज घेऊन ते बुडवणाऱ्या सर्व लोकांकडून हे पैसे वसुल करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले असून यातील पै अन पै वसुल केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
हे कर्ज बुडवणारे देशाबाहेर पळून गेले असले तरी त्यांच्याकडून ही वसुली केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. त्या आज जम्मूत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यांनी देशाच्या अर्थकारणाच्या संबंधातील माहिती यावेळी दिली.
त्या म्हणाल्या की, मोदी सरकार सत्तेवर आले त्यावेळी बॅंकांचा एनपीए ही एक मोठी समस्या होती. पण मोदी सरकारने त्यावर चार आरची उपाययोजना केली. हे चार आर म्हणजे, रिकग्नीशन, रिझोल्युशन, रिकॅपिटलायझेशन आणि रिफॉर्म. त्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून आले.
बॅंकांमध्ये सामान्य माणसांचे पैसे असतात हे पैसे बुडवून कोणी देशाबाहेर जरी पळून गेला असला तरी आम्ही त्याच्याकडून हे पैसे वसुल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा लोकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे असे, त्या म्हणाल्या. जप्त मालमत्तांचा लिलाव करून ते पैसे संबंधीत बॅंकांना दिले जातील.
प्रत्येक बुडित कर्जाच्या बाबतीत ही वसुली उपायोजना केली जाईल असेही त्यांनी नमूद केले. मोदी सरकार जम्मू काश्मीरच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.