सातारा – सर्वसामान्य माणूस आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या सहा महिन्यांत कांदाटी खोऱ्यात बांबूपासुन फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वाढीलाही जिल्ह्यात चालना देण्यात येईल. त्यादृष्टीने सुक्ष्म आराखडा तयार करुन नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील. पर्यावरणपुरक विकास हे तत्व अंगिकारण्यात येऊन त्यादृष्टीने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे याठिकाणी मिशन बांबू लागवड उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत संस्थाचे सदस्य पाशा पटेल, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार वर्मा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वनसंरक्षक श्रीमती भारद्वाज, सामाजिक वनीकरण विभागाचे वाघमोडे यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “”बांबूपासून वेगवेगळे साहित्य, फर्निचर, इथेनॉल, अलंकार वस्तू बनवू शकतो. या सर्वांच्या निर्मितीतून बांबूपासून उत्पन्नाचे एक चांगले मॉडेल तयार होईल. कांदाटी खोऱ्यातील जमीन उंच सखल आहे. या जमिनीचा वापर बांबू उत्पादनासाठी होऊ शकतो.
बांबूसाठी हेक्टरी 6 लाख 90 हजारापर्यंतची रक्कम शासन शेतकऱ्यांना टप्याटप्याने देते. चौथ्या वर्षी उत्पादन सुरु झाल्यावर एकरी एक लाखांपर्यंत त्याला उत्पन्न मिळू शकते. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शासन काम करत आहे. त्यासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय आपण घेत आहोत.
या भागातील शेतकरी आत्मनिर्भर व्हावा, सर्वसामान्य माणसाला नोकरीसाठी आपले गाव सोडून जावे लागू नये, त्याला स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.” बांबूपासून अलंकार बनविण्याऱ्या गुवाहाटी येथील नीरा शर्मा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाली असून कांदाटी खोऱ्यातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी येण्याचे त्यांनी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. बांबू उत्पादन लागवड, शासनाचे अनुदान, बांबू निर्मितीपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू याबाबत पाशा पटेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. येत्या दोन- तीन महिन्यांत 10 हजार हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन वृध्दीच्या दृष्टीने हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली.