मुंबई: मुख्यमंत्री तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला ज्या धर्माने इथवर पोहचवलं, त्याची अशी परतफेड केली. वारकऱ्यांना माउलीपर्यंत पोहचण्याचा इच्छेचा राज्य सरकारने बाजार मांडला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
इतर धर्मातील लोकांना त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी सरकारकडून मदत केली जाते. त्यात गैर नाही मग हिंदू धर्मातील परंपरेवर अन्याय का? ते देखील महाराष्ट्र घडावं, यासारखं दुर्दैव नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
“राज्य परिवहन महामंडळाने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७० हजार रुपयांचे तिकीट आकारले. सरकारने संतांच्या पादुका हेलिकॉप्टरमधून नेण्याचा शब्द पाळला नाही व बसभाडे आकारून संतांच्याच भूमीत संतांचा अपमान केला आहे. याचा महाराष्ट्र भाजप तीव्र निषेध करत आहे” अशी फेसबुक पोस्ट भाजपने त्यांच्या अधिकृत पेजवर शेअर केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फेसबुक वर पोस्ट करत राज्यसरकारवर टीका केली आहे. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांच्या पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडून ७० हजार रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, वास्तविक संतांच्या भूमीत हे विनामूल्य करणे सरकारचे कर्तव्य होते. पण यांनी नाशिक ते पंढरपूर २० वारकऱ्यांकडून ७० हजार रुपये घेतले. हे नेमकं कोणतं गणित आहे, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.