नवी दिल्ली: नीरव मोदी, मेहुल चोकसी, विजय मल्ल्या या सारखे अनेक जण देशातील बॅंकांची हजारो कोटी रुपयांची कर्ज बुडवून विदेशात पळून गेले आहेत. सरकारने त्यांना राईट ऑफ सारख्या तांत्रिक मार्गाचा वापर करून ही आडमार्गाने का मदत चालवली आहे असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी या संबंधात जाहीर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेसवरच उलटा आरोप केला होता त्याला चिदंबरम यांनी आज उत्तर दिले.
ते म्हणाले की, बॅंका तांत्रिक दृष्ट्या कोणतेही कर्ज राईट ऑफ करू शकतात आणि नंतर त्याची वसुली केली जाऊ शकते हा नियम आहे. पण या नियमाचा लाभ कर्ज बुडवून पळालेल्या लोकांना का दिला गेला हा खरा सवाल आहे. ज्यांनी जाणिवपूर्वक कर्ज बुडवली त्यांना या तांत्रिक तरतुदीचा लाभ मिळवून देण्याचे कारण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर ते कर्जबुडवे पळून गेले आहेत तर त्यांना या सवलतीचा लाभ घेण्यापासून दूर ठेवायला हवे होते, असेही त्यांनी सरकारला उद्देशून म्हटले आहे.