नवी दिल्ली – इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या 29 विषयांच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे घेतल्या जातील, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात “सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. या विषयांच्या परीक्षा घेण्याबाबतच्या निर्णयामध्ये कोणताही बदल झालेला नाही, असेही “सीबीएसई’ने म्हटले आहे. या विषयांच्या परीक्षा घेतल्या जाण्याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त व्हायला लागले होते. म्हणून “सीबीएसई’ने हे स्पष्टीकरण दिले आहे.
लॉकडाऊन उठवल्यानंतर इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या 29 विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील, असे “सीबीएसई’ने 1 एप्रिल रोजीच स्पष्ट केले होते. तसेच पेपर तपासण्याची प्रक्रियाही लॉकडाऊननंतरच केली जाईल, असेही “सीबीएसई’ने म्हटले होते. त्या निर्णयावर “सीबीएसई’ अजूनही ठाम आहे, असे आजच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आलेली नव्हती, त्यांची परीक्षा लॉकडाऊन उठवल्यानंतर घेतली जाईल, असे “सीबीएसई’मधील अधिकाऱ्याने सांगितले.
परीक्षा नव्याने घेणे अवघड आहे. मात्र, उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर परीक्षांबाबतचा निर्णय घेतला जाईल. परीक्षा घेण्यापूर्वी 10 दिवस सर्व संबंधितांना त्याबाबत कळवले जाईल, असेही “सीबीएसई’ने 1 एप्रिल रोजी म्हटले होते.