अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील आगीच्या घटना थोडे दिवस चर्चेचा विषय राहतात. यावर्षी देखील आग 1 लाख 60 हजारहून अधिक एकरवर पसरली. ग्लोबल वॉर्मिंग व नागरिकांचा बेशिस्तपणा, असे दोन मुद्दे याकाळात ठळक बातम्यात झळकतात. तथापि, यामागील खरे गुन्हेगार असलेल्या अमेरिकेतील वीज कंपन्या वादविवादापासून नेहमी लांब राहतात.
बुधवार, 9 ऑक्टोबर, 2019 रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील 34 प्रांतात वीजकंपनीने वीजपुरवठा बंद केल्याने अंधार पसरला. अनेक भागात 17 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. रेफ्रिजरेटर, संगणक, वातानुकूलन यंत्रणा आणि दिवे नसल्याने नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागला. रुग्णालयांना सतत जनरेटर सुरू ठेवावे लागले. वीजपुरवठा करणाऱ्या “पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक’ कंपनीने काही दिवसांपूर्वी अशा प्रकारे 8 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कंपनीच्या उच्चदाब वाहिन्या व इतर तारा तुटून ठिणग्या पडून आग लागण्याची शक्यता असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियाच्या उत्तर, मध्य आणि किनारपट्टी भागांव्यतिरिक्त, दक्षिणेकडील शहरात देखील जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने तेथील “सोकल एडिसन’ कंपनीतर्फे 9 ते 17 ऑक्टोबर या काळात वीज बंद ठेवण्यात आली. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, ही सगळी डोकेदुखी पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनीच्या जुन्या झालेल्या उच्च व्होल्टेज वाहणाऱ्या वाहिन्या, टॉवर्स, तसेच इतर यंत्रणेत लागत असलेल्या आगीमुळे झाली.
वेळेवर श्रेणी सुधारित न केल्याने लागली अनेक ठिकाणी आग
यावर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या “वॉल-स्ट्रीट जर्नल’ या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालात पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जगासमोर आला. त्यांना गेली अनेक वर्ष कंपनीच्या 18 हजार 500 मैल पसरलेल्या ट्रान्समिशन सिस्टममधील काही भाग अत्यंत जुनाट व धोकादायक असल्याची माहिती होती. अशा उच्चदाबाच्या वाहिन्या वापरात राहणे धोकादायक ठरू शकते याची जाणीव असून देखील यंत्रणा श्रेणीसुधारित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली नाहीत.
अमेरिकेच्या माहिती अधिकार कायद्यांतर्गत पत्रकारांनी मिळवलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2017 दरम्यान वाइन काउंटीत लागलेली आग ही कंपनीच्या वीज यंत्रणांमुळेच लागल्याचा अंदाज होता. परंतु यानंतर देखील त्यांनी “झाकली मूठ सव्वा लाखाची’ असा दृष्टिकोन बाळगला. मागील वर्षी (2018) कॅलिफोर्नियात लागलेल्या भीषण “कॅम्प फायर’ घटनेत राज्यातील बुट्ट काउंटीमधील पॅराडाइस नावाचे शहर संपूर्णपणे नष्ट झाले. यात 85 लोक मरण पावले आणि कोट्यवधी किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. राज्याच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक आणि प्राणघातक आगीच्या घटनेमागे पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनीच्या उच्चदाबाच्या वाहिन्या असल्याचे तपासात समजले.
आगीच्या घटनेमुळे कंपनीविरोधात अब्ज डॉलर्सचे दावे लागणार अशी त्यांना भनक लागताच या वर्षी जानेवारी महिन्यात कंपनीने दिवाळखोरीची याचिका दाखल केली. नंतर काही दिवसांतच पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिकच्या अधिकाऱ्यांनी 14 हजारहून अधिक घरे नष्ट करणारी आग उच्चदाबाच्या वाहिन्या व यंत्रणांमुळे लागल्याचे कबूल केले. तेव्हापासूनच कंपनीच्या नवीन धोरणाप्रमाणे खराब हवामानाच्या परिस्थितीत 115 केव्ही पेक्षा जास्त वीज वाहून नेणाऱ्या धोकादायक उच्चदाबाच्या वाहिन्या सरळ हवामान सुधरेपर्यंत बंद ठेवण्यात येतात. पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक व्यतिरिक्त सोकल एडिसन कंपनीच्या उत्तर लॉस एंजेलिस स्थित ट्रान्समिशन टॉवर मध्ये झालेल्या अपघातामुळेच लॉस एंजेलिस जवळील सिल्मर परिसरात या महिन्यात “सॅड्लरिज आग’ पेटल्याचे धागेदोरे नुकतेच समोर आले आहेत. या खासगी कंपन्यांविरोधात अमेरिकन सरकार कडक कारवाई का करत नाही हा विचार करण्याचा मुद्दा आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अधिक वेगाने भडकते आग
कॅलिफोर्निया राज्यातील कॅलिमेसा शहराच्या सॅंडलवुड ड्राइव्ह परिसरात 11 ऑक्टोबर रोजी लागलेली आग सर्वात भयंकर ठरली. एका कचरा वाहणाऱ्या ट्रक चालकाने जळत असलेला कचरा रस्त्याच्या कडेला कोरड्या गवताच्या जंगलात टाकल्याने वणवा पेटल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. यात अकराशे एकरांवर पसरलेल्या रानाचे, तसेच निवासी मालमत्तेचे नुकसान झाले. आगीत 76 घरे पूर्णपणे नष्ट झाली व घरात अडकलेल्या 2 ज्येष्ठ नागरिकांचे जीव गेले. आगीवर नियंत्रण आणण्यास तब्बल 7 दिवसांनी यश आले.
तज्ज्ञांनी मांडलेल्या आकडेवारीप्रमाणे अमेरिकेत दरवर्षी लागणाऱ्या आगींपैकी 84 टक्के मानवनिर्मित कारणांमुळे लागतात. परिसरातील तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षा पुढे जात असूनही लोक जबाबदारीने वागत नाहीत. अर्धवट जळलेले सिगारेटचे तुकडे, जळत ठेवलेला कचरा, टायर, तसेच जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे एकमेकांवर आदळणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्यातून निघणाऱ्या ठिणग्या विध्वंसक आणि प्राणघातक आगीस कारणीभूत ठरतात. आगीच्या घटना उन्हाळ्याच्या शेवटी व हिवाळा सुरू होण्यामधील कालावधीत घडतात. अमेरिकेच्या काही राज्यात हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे (ग्लोबल वॉर्मिंगमुळे) परिसरातले तापमान अधिकच गरम राहते. अशा हवेत माती आणि वनस्पतींमधून पाण्याचे अंश लवकर झिरपून जातात. परिणामी कोरडे गवत, झाडे आणि झुडुपे लवकर पेट घेतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हवेतील वाढत्या उष्णतेमुळे कॅलिफोर्निया सारख्या अनेक राज्यात आगीला खतपाणी पुरवणारे वातावरण राहते.
उच्चदाब वीज वाहिन्या भूमिगत करणे ठरते खर्चिक
उच्चदाब वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी लागणारे विशेष प्रशिक्षण असलेले कामगार, साहित्य व अनेक महिने चालणारी खोदकामे, यामुळे असे प्रकल्प महागडे ठरतात. कोलोरॅडो येथील एक्ससेल एनर्जी या कंपनीच्या संकेतस्थळावर असलेल्या आकडेवारी प्रमाणे अमेरिकेत 230 केव्ही हाय-व्होल्टेज ट्रान्समिशन लाइन भूमिगत करण्यासाठी येणारा खर्च ओव्हरहेड लाइनच्या तुलनेत 10 ते 15 पट जास्त आहे. भूमिगत उच्चदाब वीज वाहिन्या 40 वर्षं टिकतात, याउलट ओव्हरहेड वीज वाहिन्यांचे आयुष्य 80 वर्षांपेक्षा जास्त असते. यामुळे वीज पुरवणाऱ्या कंपन्या अशी कामे करण्यात उत्सुकता दाखवत नाहीत.
भारत हा विकसनशील देश असून देखील यावर उपाय योजना करू शकतो तर मग अमेरिकेसारख्या विकसित देशाचे सरकार वीज कंपन्यांच्या हलगर्जीपणामुळे अरबो रुपयांचे नुकसान होताना दिसूनही शांत कसे राहते हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या नावाखाली मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात जगभरातील नेतेमंडळींना बोलवून भाषण करण्याची संधी दिली जाते. अनेक देश पर्यावरण जपण्यासाठी आखलेल्या योजनांची यादी पुढे करतात. यापेक्षा, विकसित देशांनी आगीमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करणे जरी सोडले तरी ग्लोबल वॉर्मिंगवर ताबा ठेवण्याच्या दिशेने ते योग्य पाऊल ठरू शकते.
भारतातील वीज यंत्रणा होत आहे स्मार्ट
असुरक्षित रोहित्र, बंद पथदिवे, गंजलेले वाकलेले वीज खांब व शहराच्या वीज यंत्रणेतील गुंतागुंतीच्या वाहिन्यांमुळे लागलेल्या आगी आणि होणारे मृत्यू भारतीय लोकांसाठी काही नवीन प्रकार नाहीत. परंतु 80 ते 90 च्या दशकात वीज यंत्रणेमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येच्या तुलनेत सध्याची आकडेवारी खूपच कमी आहे. वीज यंत्रणा स्मार्ट करण्याच्या दिशेने भारतातील अनेक शहरात स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामांना सुरुवात देखील झाली आहे. बऱ्याच उपकेंद्रांची क्षमता वाढवली जात आहे, तसेच वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर देखील बसवले जाणार आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर आवश्यकतेच्या तत्त्वानुसार वीज यंत्रणांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्याच्या हेतूने भारतात राज्य व केंद्र सरकार कामाला लागली आहेत.
नित्तेंन गोखले