Rahul Gandhi – पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi) सर्व ठिकाणी प्रचारसभांमध्ये सांगतात की ते ओबीसी आहेत. जर तुम्ही स्वत:ला ओबीसी मानता, तर मग जातनिहाय जनगणनेला तुमचा विरोध का आहे? ज्यावेळी जातनिहाय जनगणनेचा विषय येतो,
त्यावेळी मोदी म्हणतात की, भारतात एकच जात आहे ती म्हणजे “गरीब.’ म्हणून मोदीजी, तुम्ही जातनिहाय जनगणनेच्या विरोधाची कारणे सांगितली पाहिजेत, असा हल्ला वायनाडचे खासदार आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.
छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे जाहीर सभेत गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला. राहूल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दिलेली सर्व आश्वासने, मग ती काळ्या पैशावर असोत, नोटाबंदी असोत किंवा पूर्वी रद्द केलेले कृषी कायदे असोत, एकतर खोटी होती किंवा ती कधीच लोकांपर्यंत पोहोचवली गेली नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले आणि त्यांनी तुम्हाला 15 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. ते 15 लाख रुपये तुम्हाला मिळाले का? मोदी म्हणाले होते की, नोटाबंदीमुळे काळा पैसा संपेल. तसे झाले का? शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा फायदा होईल, असेही मोदी म्हणाले होते. पण शेतकऱ्यांनीच तेच विधेयक नाकारले. त्यामुळे तुम्ही कोण खरे बोलतो आणि कोण खोटे बोलतो ते ओळखा.
राहुल गांधी म्हणाले की, गेल्या निवडणुकीत त्यांनी छत्तीसगडच्या जनतेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह जी काही आश्वासने दिली होती, ती भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने पूर्ण केली आहेत. “शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असं मी गेल्या निवडणुकीत म्हटलं होतं. मागच्या वेळी आम्ही म्हटलं होतं, वीज बिल निम्मं होईल.
यावेळी 200 युनिटपर्यंत वीज वापराचे वीज बिल माफ केले जाणार आहे. याचा अर्थ छत्तीसगडमधील 40 लाख कुटुंबांना विजेसाठी एक पैसाही मोजावा लागणार नाही. हे भारतातील पहिले राज्य असेल जिथे प्राथमिक ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत असेल.
दरम्यान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. छत्तीसगडमधील उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.