मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. रितेश देशमुखसोबत ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जेनेलिया दिसली होती. मात्र रितेशसोबत लग्न झाल्यानंतर तिने सिनेक्षेत्रातून ब्रेक घेतला होता. यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. मात्र आता जेनेलियानेच याबाबतचा खुलासा एका कार्यक्रमात केला आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या चॅट शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी करीनाने लग्नानंतर चित्रपटांमधून ब्रेक घेण्यामागचे कारण विचारले. यावर जिनिलियाने सांगितले की, “जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा मला लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली असे लोकांनी गृहीत धरले होते, मात्र जेनेलियाने असे अजिबात नसल्याचे सांगितले.”
पुढे ती म्हणाली, “लग्नापूर्वी मी हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये खूप काळ काम करत होते, परंतु लग्नानंतर मला कुटुंबाला प्राधान्य द्यायचं होतं. तो माझा स्वतःचा निर्णय होता. अनेकांनी मला विचारलं की रितेशने तुला चित्रपटांमध्ये काम करायला मनाई केली का? तेव्हा मी त्यांना सांगितलं की मलाच दीर्घकाळ अभिनय केल्यानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घ्यायचा आहे.’ यावर रितेश देखील चित्रपटांपासून दूर राहणं आणि परत येणं ही जेनेलियाची स्वतःची निवड असल्याचे म्हणाला.
दरम्यान, रितेशने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटातून जेनिलियाने चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. रितेश-जेनेलिया ही खऱ्या आयुष्यातील जोडी मराठी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. 30 डिसेंबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.