नवी दिल्ली -महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आधी निश्चित झाल्याप्रमाणे आज 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ते प्रकरण त्या दिवशीच्या न्यायालयीन कामकाजाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. आता सगळ्यांचेच लक्ष त्या सुनावणीकडे लागले आहे.
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात उपस्थित झालेले मुद्दे पहिल्यांच उभे राहिले आहेत, असं याआधी कधीच झालं नव्हतं’ असं निकम म्हणाले.
ते पुढे म्हणाले,’आजच्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यायची की नाही, याबाबत युक्तिवाद होईल आणि यात मुलभूत प्रश्नाबाबत घटनापीठ विचार करुन काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. त्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्याविषयीची सुनावणी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ठरणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून काही दिवस शिवसेनेच्या दोन गटांमध्ये मोठी रस्सीखेच झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो पेच तूर्त तरी सुटला आहे. उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली.