मुंबई – शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकार मध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रविवारी अंजनगांव सुर्जी येथील मठातून दर्शन करुन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करित पन्नास खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते या घटनेवर माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये. आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं’ असं म्हणत राणे यांनी टीका केली आहे.
दरम्यान,अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरीता आल्याची कुणकूण तालुक्यातील शिवसैनीकांना लागली होती. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सहा वाजताचे दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी पन्नास खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्या मारत नारेबाजी केली. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही. सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.