पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अकरावी ऑनलाइन प्रवेश व विविध कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने विशेष भरारी पथक नियुक्त करण्याचे आदेश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बजावले होते. आता प्रवेश प्रक्रिया संपत आली असून अद्यापही या पथकाची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. पथक नेमण्याचा अधिकाऱ्यांना विसरच पडला आहे.
पुणे विभागात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. 296 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 4 हजार 139 प्रवेश उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अकरावीसाठी तीन मुख्य फेऱ्या व त्यानंतर विशेष फेरीही घेण्यात आलेली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील प्रवेशाची फेरीही झाली आहे. प्रवेश प्रक्रियेतील महत्वाच्या सर्वच फेऱ्यांचे कामकाज संपले आहे. प्रवेशासाठी नियमाप्रमाणे राखीव कोटाही निश्चित करून देण्यात आलेला आहे. व्यवस्थापन, इनहाऊस, अल्पसंख्याक या राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रियाही राबविण्यात आली. राखीव कोट्यातील प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना कसरत करावी लागल्याचे चित्र अनेक महाविद्यालयात पाहायला मिळाले आहे. व्यवस्थापन कोट्यातून नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यात काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. अजूनही प्रवेश न मिळालेले विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
सर्व प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची रचनाही निश्चित करून देण्यात आली होती. प्रत्यक्षात आजतागायत प्रवेशाच्या तपासणीच्या कामासाठी कोणतेही भरारी पथकच नियुक्त करण्यात आलेले नाही, अशी माहिती आहे. बहुसंख्य महाविद्यालयांत जागा रिक्तच असतानाही प्रवेश मिळत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे.