नवी दिल्ली: देशभरात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक राज्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे आता अनेक राज्यांनी लॉकडाऊन उठवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लवकरच अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 65 हजार 553 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 460 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 76 हजार 309 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. 46 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे.
दिल्ली:
दिल्लीत 7 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, 31 मेपासून राज्यात अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यामध्ये सर्वप्रथम औद्योगिक कारखाने आणि उत्पादकांवरील निर्बंध हटवण्यात येतील.
मध्य प्रदेश:
मध्य प्रदेशात 1 जूनपासून अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. सध्या मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू आणि दर रविवारी जनता कर्फ्यू लावला जात आहे. कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळी नियमावली आहे. 1 जूनपासून कमी संक्रमण असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकाने सहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मोकळीक दिली जाईल. तसेच हॉटेलमध्ये क्षमतेपेक्षा निम्म्या लोकांना प्रवेश असेल.
हिमाचल प्रदेश:
31 मे पासून सकाळी 9 वाजता ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी वीकेंड कर्फ्यूमुळ केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडी राहतील. सरकारी कार्यालयांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवस सुरु राहील.
उत्तर प्रदेश: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या उत्तर प्रदेशातील परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाऊन उठवायचा का, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जूनपासून काही निर्बंध शिथील झाले तरी नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यू लागू राहील. मात्र, बांधकाम क्षेत्र, दुकाने आणि हॉटेलांना काहीप्रमाणात नियमांतून सूट मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र:
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात न आल्यामुळे लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, 1 जूनपासून काही प्रमाणात निर्बंध उठवले जातील. त्याची नियमावली लवकरच जाहीर होईल.
झारखंड:
झारखंडमध्ये 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
राजस्थान:
राजस्थानमध्ये 8 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, 1 जूनपासून निर्बंध काहीप्रमाणात शिथील होतील.
पश्चिम बंगाल:
पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात कोरोना निर्बंध कायम असतील.