मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात मोठी खळबळ माजली. त्यातच आता शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे अनेक जण अजित पवार यांच्याबरोबर गेलेत.
मात्र, अश्यातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अजित पवार गटाकडे वाटचाल सुरु आहे, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, आता या सर्व राजकीय अफवांवर आज (दि. 6) स्वतः जयंत पाटील यांनी खुलासा केला. “मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन..’ असे सूचक विधान देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “माझ्यबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. अशा बातम्यांमुळे माझे मनोरंजन होत आहे. मी कोठे जाणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेलं नाही. माझ्यबद्दल काही अफवा पसरवल्या जात आहेत. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे.
काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत. मी शरद पवार यांच्यासाोबतच आहे. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटल्याच्या चर्चाही निराधार आहे, असा दावा करत मी कुठेही गेलो तरी तुम्हाला सांगून जाईन.’ असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.