नवी दिल्ली – मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आज आपल्या बचावासाठी अरविंद केजरीवाल यांनी अनेक युक्तीवाद केले. त्यातच त्यांनी एक असा दावा केला की ज्या आरोपींनी या प्रकरणात त्यांचे नाव घेतले त्या सगळ्यांची सुटका करण्यात आली आहे. ते म्हणाले कोणत्याच आरोपीने मागच्या जबाबांमध्ये त्यांचे नाव घेतले नव्हते.
मात्र अखेरच्या जबाबात त्यांचे नाव घेण्यात आले व आरोपींना ताबडतोब दिलासा दिला गेला. आरोपी शरद रेड्डीने भारतीय जनता पार्टीला ५५ कोटी देणगी दिली आणि लगेच त्याला जामीन मिळाला. आम्ही १०० कोटी रूपये घेतले असा आरोप केला गेला आहे.
मात्र न्या. संजीव खन्ना यांच्या एका आदेशात या आरोपाला संशयास्पद ठेवण्यात आले आहे. शरद रेड्डी आपल्या ९ पैकी ८ जबाबांत लाच दिल्याचे एकदाही म्हणत नाहीत. मात्र नवव्या जबाबात माझे नाव घेतो आणि त्याला जामीन मिळतो.
दरम्यान, ईडीच्या आरोपपत्रात एकदा नाही अनेक वेळा केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्याचे कारण असे सांगितले जाते आहे की दिल्लीचे मद्य धोरण जेंव्हा ठरवले जात होते तेंव्हा या घोटाळ्यात आता जे अडकले आहेत त्या सगळ्यांशी केजरीवाल यांचा संपर्क होता.
भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांचे अकाउंटंट बुचीबाबू याची चौकशी करण्यात आली होती. त्यानेही केजरीवाल यांचे नाव घेतले होते. के. कविता, मनिष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांच्यात राजकीय समझोता सुरू होता असे त्याने स्पष्टच सांगितले होते असे आतापर्यंत तपासात आढळून आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.