पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणेकरांना समान पाणी देण्यासाठी २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. पण, दोन वेळा मुदतवाढ देऊनही योजनेचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे पुणेकरांंना पुरेसे पाणी मिळणार तरी कधी? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
तब्बल २,५१५ कोटी रुपयांच्या या योजनेच्या कामाला दोनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर मार्च-२०२४ पर्यंत योजना पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता बहुतांश काम सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ पर्यंत होईल. तर योजनेचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण झालेले असेल, असे वेळापत्रक महापालिका आयुक्तांंनी अंदाजपत्रकाच्या माहितीत जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या योजनेसाठी पुणेकरांची पाणीपट्टी पहिल्या पाच वर्षांत दुप्पट झाली, ते पाणी अजूनही मिळालेले नाही.
सन २०१६-१७ मध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना या नावाने या योजनेची सुरुवात झाली. मात्र, सर्वच भागाला चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने तसेच राजकीय विरोधानंतर या योजनेचे नामकरण समान पाणीपुरवठा योजना असे करण्यात आले. पुढील ३० वर्षांचा विचार करून शहराची लोकसंख्या ५० लाख गृहीत धरून या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
या शिवाय शहरातील पाणी वितरणामधील ४० टक्के गळती कमी करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात ८३ पाण्याच्या टाक्या उभारणे, १,६०० कि.मी.च्या नवीन जलवाहिन्या टाकणे, तसेच सुमारे २ लाख ८० हजार पाण्याचे मीटर बसविणे अशी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी, महापालिकेने २०० कोटींचे कर्जही काढलेले आहे, मात्र, आतापर्यंत पालिकेने केवळ ५१ टाक्या उभारल्या असून, ८५० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. तर, सुमारे १ लाख ८० मीटर बसविलेले आहेत.
तिसऱ्यांदा मुदतवाढ
ही योजना मार्च २०२३ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, करोना, लॉकडाउन व अन्य कारणांनी योजनेचे काम रखडले. त्यामुळे सुरुवातीला सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि त्यानंतर मार्च-२०२४ पर्यंत योजनेस मुदतवाढ मिळाली. आता प्रशासनाने जून २०२४पर्यंत मुदतवाढीची मागणी केली होती. त्याला मान्यता देण्यात आली. मात्र, आता जूनमध्येही ही योजना पूर्णत्वास जाणे शक्य नसल्याची अप्रत्यक्ष कबुलीच विक्रमकुमार यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण करताना दिली.