किवळे, (वार्ताहर) – सांगवडे गावातून मामुर्डीकडे येण्यासाठी एक साकव बांधण्यात आला आहे. हा साकव अत्यंत जूना झाला असून तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यावरून जाणाऱ्या मोटार गाड्या बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण काही चालक या आदेशांना न जुमानता यावरून मोटारी नेत आहेत. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला असून हा पूल होणार कधी? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.
सांगवडे ते मामुर्डीदरम्यान पवना नदीवर साकव बांधण्यात आला आहे. हा साकव जूना आणि जीर्ण झाला आहे. यावरून जात असताना याच्यावरील फळ्या खाली वाकतात. लोखंडी कड्या अनेक ठिकाणी तुटल्या आहेत. एकंदरीतच या साकवकडे कोणाचेही लक्ष जात नाही. यावरून येणारी वर्दळ मोठी आहे. सांगवडे, दारूंब्रे अशा किमान चारगावावरून नागरिक या साकवावरून ये-जा करतात.
शिवाय शालेय विद्यार्थी व कामगारांना सोयीस्कर होत असल्याने त्यांचाही वावर मोठा आहे. पूर्वी येथे नावेने ये-जा करत होते. त्यानंतर साकल झाला. आता तोही मोडकळीस आल्याने येथे पूल बांधण्यात येणार होता. मात्र, दहा वर्षांपेक्षा अधिक काळ गेला तरीही पूल काही होत नाही. हा साकव कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे नदीवर पूल बनवणे अत्यावश्यक झाले आहे.