पुणे (गणेश आंग्रे) – शिक्षण अवघे आठवी पास… पण, वडिलांच्या निधनानंतर ते शिपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात रूजू झाले…साहेब सांगतील तशी, जमेल ते कामे करत त्यांनी चिकाटी सोडली नाही… दहावीचे शिक्षणही पूर्ण केले. आता तब्बल 40 वर्षांच्या प्रामाणिक सेवेनंतर याच विभागात एका दिवसासाठी “उपजिल्हाधिकारी’पदी बढती मिळाल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. ही थक्क करणारी गोष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील रघुनाथ ताडगे यांची. ताडगे हे 31 मे रोजी “उपजिल्हाधिकारी’ म्हणून सेवानिवृत्त झाले. ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
बोरीपार्धी ता. दौंड येथील ताडगे हे 19 व्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावर 1983 मध्ये रुजू झाले. त्यावेळी त्यांचे शिक्षण आठवी पास होते. 15 वर्षे शिपाई म्हणून काम केले. दरम्यान, ताडगे यांच्या सहकारी मित्रांनी 17 नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा आग्रह केला. 1996 मध्ये ते दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले.
1999 मध्ये त्यांचे प्रमोशन होऊन पुरवठा विभागात गोदाम पालक म्हणून नेमणूक झाली. यानंतर 2005 मध्ये पुरवठा निरिक्षक, 2010 मध्ये नायब तहसीलदार, 2017 मध्ये तहसीलदार समकक्ष असलेल्या सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. यानंतर 30 मे 2022 रोजी त्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली आणि पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. त्यामुळे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी पदाचा पदभार दि. 31 मे रोजी स्वीकारल्यानंतर त्याच दिवशी ते सेवानिवृत्त झाले. दरम्यान, या अनोख्या संधीमुळे अधिकारी होण्याचे ताडगे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रामाणिकपणाचे फळ
40 वर्षांच्या सेवेत प्रामाणिकपणे केलेले काम, सर्व वरिष्ठ अधिकारी व सहकारी मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच या पदापर्यंत पोहचता आले, अशी भावना सेवानिवृत्त शहर अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रघुनाथ ताडगे यांनी व्यक्त केली.