शिर्डी -केंद्रातील भाजपचे सरकार हे लोकशाही विरोधी, जनविरोधी असून हे सरकार उलथवून लावले पाहिजे. एक सक्षम देश म्हणून उभे करण्यात कॉंग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे, परंतु मागील आठ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलले असून जाती-धर्माच्या भिंती उभ्या करून भारत तोडोचे राजकारण केले जात आहे. या विध्वंसक प्रवृत्तीला थोपवून कॉंग्रेसच्या भारत “जोडो’ने उत्तर द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केले आहे.
शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी झाले. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यशाळेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह कॉंग्रेसचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबारातील ठराव व प्रस्ताव यांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे. राजकीय व सामाजिक विषयावर आधारीत सहा गट विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायचे यासंदर्भात ठोस धोरण ठरवले व त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाईल. एक व्यक्ती, एक पद’ या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. याबरोबरच राजकीय पातळीवरील आव्हानांचा सामनाही आपल्याला करावयाचा आहे. हा देश कॉंग्रेसच्या त्यागाने,बलिदानाने उभा राहिलेला आहे, परंतु आज देशच संकटात सापडलेला आहे. जेव्हा जेव्हा हिमालयावर संकट येते तेव्हा सह्याद्री मदतीला धावतो, हा इतिहास असून आज देशाला महाराष्ट्राची गरज आहे.
आज पुन्हा एकदा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जाईल, असे नाना पटोले म्हणाले. थोरात म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांनीही तोच विचार दिला असून तोच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा कॉंग्रेसचा हा विचारच देशाला तारणारा आहे. पुढे घेऊन जाणारा आहे. कॉंग्रेसशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही, म्हणूनच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा कॉंग्रेस’चा जो नारा दिला आहे. तो प्रत्यक्षात आणण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि देशात व राज्यात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार आणू, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
सकाळच्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन झाले. दुपारी राजकीय, संघटन, आर्थिक, शेती, शेतकरी आणि सहकार, सामाजिक न्याय आणि युवा व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा गटाची चर्चा झाली. या सहा गटांनी तयार केलेल्या रोडमॅपचे दुसऱ्या दिवशी सादरीकरण होईल. सूत्रसंचालन उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.