सोलापूर – रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचा नाव शकुनी मामा म्हणून लिहिले जाईल’, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. सोलापुरातील कासेगाव येथे शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून आरोप केल्यानंतर शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर सदाभाऊ खोत यांनी भाष्य केले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, “राज्यपाल राजवट उठवण्यासाठी अजित दादांना शपथ घेण्यासाठी शरद पवारांनी पाठवले हे मी सोलापुरात बोललोच होतो. त्यानंतर परवा त्यांनी खरं सांगितलं मी गुगली टाकली होती, हे महान क्रिकेटपटूच आहेत. महाराष्ट्राचा राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचे नाव शकुनी मामा म्हणून लिहिले जाईल.”
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रवादी हा पक्ष नाही ही टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर सहकारी कारखाना बंद पडला की लगेचच घेतात, बंद पण हेच पडतात आणि खासगी करून हेच चालवतात. सहकारीमधून खासगीकरण केलेले शरद पवार यांच्या ताब्यात जवळपास 50 कारखाने आहेत. स्वर्गात जाताना खालूनवर नेता आलं असतं या जातीने खाली काहीच ठेवलं नसतं, नेता येतं नाही म्हणून जमलं आहे.”
“शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष बेकायदेशीर होते. क्रिकेटचा अध्यक्ष हा बॅटिंग, बॉलिंग, फील्डिंग करता येणारा असावा. पण शरद पवार यांना काहीच येत नाही. शरद पवारसाहेब कुस्ती संघाचे अध्यक्ष होते.. त्यांनी कधी कुस्त्या गाजवल्या नाहीत. हिंदकेसरी कधी मिळवला आहे का हे कधी मी ऐकलं नसल्याचे खोत म्हणाले. जिथे पैसा तिथे पवार घराणे आहे. पैसा यायला लागला की ते कशाचेही अध्यक्ष होतात,” असेही खोत म्हणाले. याशिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले. देवेंद्र फडणवीस हा पहिला पठ्या मिळाला की यांची गुगली बी उडवली, बॅट बी घेतली, स्टंप पण घेतल्या आणि यांचा बॉल पण गेला, असेही सदाभाऊ म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले होते?
मी देखील जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कसा आणि कुठे टाकायचा, हे चांगलं माहिती आहे. समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करु शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात, हे दिसून आल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.