पाऊस… तीन अक्षरी शब्द! पण त्याच्याशिवाय सृष्टी निर्जीव होईल. पाऊस… नाव एकच पण रूपं वेगळी नक्षत्र वेगळी… पावसाचं वय असतं? होय! पाऊस चिरतरुण असतो… मरगळलेल्या धरणीस नवसंजीवनी देतो आणि तिच्या कुशीतून असंख्य प्रकारचे जीव अंकुरतात, नवचैतन्य येते दाहीदिशेला… सृष्टीचे अन् मानवी जीवनचक्र अव्याहतपणे चालवणारा पाऊस नेहमीच उत्साहाने सळसळलेला! कधी बालिश होऊन भुरभुरतो, कधी युवक होऊन बरसतो तर कधी तरुण होऊन कोसळतो!
पाऊस… प्रत्येक वेळी मनावर अधिराज्य गाजवणारा… कधी हवासा तर कधी नकोसा, कधी खट्याळ तर कधी अल्लड, कधी रोमॅंटिक, तर कधी रुसका कधी चिडलेला तर कधी रागावलेला… कसा जरी असला तरी त्याचं अस्तित्व दाखवून देणारा…मनमौजी… कधी आखडू तर कधी हट्टी अगदी लहान मुलासारखा! अवखळ होऊन खळाळतो तर कधी तरुण होऊन उंचावरून फेसाळत डोंगरदऱ्यातून उड्या मारत राहतो, कधी समंजस, पोक्त होऊन संततधार बरसतो.
पाऊस कुठलाही असो मनावर परिणाम करतोच! आकाशातला तो मन चिंब करणारा अन् डोळ्यातला तो मन हळवं करणारा… व्याकुळ करणारा… कळत्या वयापासून प्रत्येकाची साथ सोबत करणारा… कधी गोड कधी कडू तर कधी हळव्या आठवणींना जागे करणारा…
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
म्हणत मनात घट्ट रुतत जाणारा… आठवतो मला कळत्या वयात येरे येरे पावसा तुला देतो पैसा म्हणत अंगणात आनंदाने बागडायला लावणारा… तापलेल्या फुपुट्यावर पडून मृदगंधाने वेड लावणारा!
आठवते अजून आकाशात काळे ढग जमू लागले की छप्पर शाकारणारी माणसे फिरायची प्रत्येकाला विचारत… कौलं शाकारायची का ओ… कुणी घर देता का घर? च्या आर्जवात! कुणी शाकारून घ्यायचे तर कुणी नाही पण शाकारणाऱ्या माणसाला घासाघीस करून दोन पैसे मिळायचे. शेजारी कुठं काम चालू असलं की मग मान वर करून त्याचं काम निरखत बसायचो तासन्तास!
असाच येणारा छत्रीवाला! ती मोठी आठ काड्याची छत्री दुरुस्त करून मोडक्या काड्या बांधून, कुठं फाटली असेल तर ठिगळ लावून पाऊस झेलण्यास तिला सज्ज करायचा अन् आलेल्या पैशातून आपल्या परिस्थितीला ठिगळ जोडायचा. हेही काम पहाण्याची मजा औरच! तारेने काड्या बांधणे मग सुई दोरा काढून छिद्राला हळुवार टाका घालणे… त्याच्याजवळ बसून निरखत रहायचो त्याच्या त्या हालचाली. आजूबाजूला आम्ही आहोत म्हणून त्यालाही कामाला हुरूप यायचा. गाडग्या मडक्यातला राखेत घातलेला बी बेवळा बाहेर यायचा,
शेतातली कामं सुरू होऊन सगळे शेताला जायचे, बैलगाड्या कुरी, धान्याची गठुळी घेऊन शेताची वाट धरायच्या अन् आम्ही शाळेची!
कधी शाळेच्या गळक्या पत्र्यांतून खाली पडणारा तर कधी कौलांच्या पागोळ्यातून ओंजळीत पाऊस झेलायचा. आकितीला अंगणात केलेली वेगवेगळ्या भाज्यांची आळी, वाफे पावसाच्या पाण्याने भरून तुडुंब व्हायचे अन् लावलेलं बी छान उगवणार म्हणून किती आनंद व्हायचा! बऱ्याचदा धो धो पाऊस बघायला खिडकीत चढून बसायचो अन् इकडून तिकडून धावणारे पाणी नजरेत टिपायचो. बऱ्याचदा लाइट जायची अन् आम्ही कंदील लावून कांबळी पांघरून अभ्यास करायचो अन् आई हरभरे भाजून द्यायची खायला! किती मजेशीर होता तो पाऊस! ओढ्याला तांबडं पाणी खळाळत राहायचं, बांध फुटायचे, दीप वहायचे अन् वघळी तुडुंब वहायच्या, कुणाची म्हैस वाहून जायची तर कुणाची शेळी, तर कधी एखादं माणूस!
दप्तर कधी डोक्यावर तर कधी पोत्याची कुंची करून एका हाताने पाठीवर दप्तर धरत तर एका हातात कुंची सावरत रिपरिप पाऊस झेलत घरला यायचो. पुढे हायस्कुलला तर चप्पल घाण होते अन् पावसाने चप्पल तुटली तर उन्हाळ्यात घालायला मिळणार नाही म्हणून चिखलातून तसेच चालत शाळेला जायचो. शाळेत गेल्यावर आणि घरी आलो की पाय स्वच्छ धुवायचो. बऱ्याचदा पावसाने रस्त्यावर आलेले काटे भिजून नाजूक झालेल्या पायात घुसायचे पण तसेच चिखल तुडवत लंगडत रस्ता चालायचो. गणवेशावर चिखलाची नक्षी उठू नये म्हणून फार जपायचो.पाऊस आता सवयीचा होता.
पुढं कॉलेजला आल्यावर खूप खूप भिजावे वाटायचं पावसात, पण भिजत नव्हतो, मुलं बघतील चिडवतील म्हणून, पण घरी कुणी नसलं की मात्र मनसोक्त भिजायचं.लग्नानंतर मात्र मनसोक्त भिजून घेतलं अन् सोबतीला मग गरम भजी! पाऊस पडला की घरी भजी असणारच! हे आता सवयीचं झालेय. अजूनही भिजते मनसोक्त अन् भजीही खाते मनसोक्त, कुणी काही म्हणो! छत्री न घेता थांबत थांबत रस्त्यावरून मनसोक्त भिजत येणे हा माझा न चुकणारा भिजरा पावसाळी छंद!
असा हा वळणा वळणाचा तजेलदार पाऊस आता या वळणावर कविता लिहायला भाग पाडतो. माझं वय वाढलं म्हणून पावसाचं वय बिल्कुलच नाही वाढलं उलट अजूनही तो माझ्यासाठी तसाच आहे अगदी तारुण्यातल्या टवटवीत दिवसासारखा… माझ्या खट्याळ, रोमॅंटिक, हळव्या प्रियासारखा… भेटीची अन् सहवासाची अवीट ओढ लावणारा… सजणीला भेटायला आतुर असणाऱ्या जीवलगासारखा… प्रिय!
– सुचित्रा पवार