पुणे – अवकाळी पावसामुळे गव्हाची आवक मंदावली आहे. काही भागात पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत गव्हाच्या भावात मार्केट यार्डातील भुसार बाजारात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे.
मागील काही दिवसात गव्हाचे भाव स्थिर होते. मात्र, काही दिवसांपूर्वी गहू उत्पादित प्रदेशात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
सध्या खानदेश, गुजरातमधील सौराष्ट्र, मध्यप्रदेश येथून गव्हाची आवक सुरू आहे. नव्या गव्हाची नियमित आवक सुरु आहे. एप्रिसलअखेर पासून बाजारात हरियाणा आणि पंजाब येथील गव्हाची आवक सुरू होईल. सध्या पुण्यात दररोज गव्हाची 20 ते 25 ट्रक आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे बाजारात गव्हाची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भाव तेजीत आहेत. गव्हाची कायमच मागणी असते. गव्हापासून ब्रेड आणि बेकरीचे प्रदार्थ मोठ्या प्रमाणात बनतात. देशात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह आणखी काही राज्यात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले असल्याची माहिती व्यापारी श्याम लढ्ढा यांनी दिली.
भारत गव्हाचे उत्पादन घेण्यात जगातिल दुसरा क्रमांक आहे. मात्र, युक्रेन रशिया युध्दामुळे मागील वर्षी जास्त निर्यात झाली होती. सध्या निर्यात बंदी असली, तरीही कधीही निर्यात बंदी उठेल. भाव अधिक मिळेल, त्यामुळे काही व्यापारी माल राखून ठेवत आहेत. देशातून बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, चीन, नेपाळ, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, येमन रिपब्लिक, कतार, ओमान आणि पश्चिम आशिया आणि युरोपातील काही देशात गहू निर्यात केला जातो. मात्र यंदा सर्वत्र होत असलेल्या अवकाळीचा गहू उत्पादनावर परिणाम झाला आहे.
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध भागातील गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यातच निर्यातबंदी उठल्यावर भावात वाढ होईल, या शक्यतेने काही ठिकाणी माल राखून ठेवण्यात येत आहे. परिणामी, राज्यासह परराज्यातून होणारी आवक घटली आहे. महिनाभरात भावात किलोमागे तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे.
– विजय मुथा, अन्नधान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.