पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जांगावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असलेले “आरटीई’ पोर्टल गेल्या सहा दिवसांपासून अद्यापही बंदच आहे. पोर्टलवर अचानक लोड येत असल्याने तांत्रिक अडचण कायम आहे. पोर्टल बंदमुळे अलॉटमेंट लेटरची प्रिंटच घेता येत नसल्याने जाहीर झालेल्या बालकांच्या पालकांना पडताळणी समितीकडे जावून कागदपत्रांची पडताळणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येवू लागला आहे.
“आरटीई’ अंतर्गत बालकांना घराजवळच्या नामांकित शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू असते. “आरटीई’ अंतर्गत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी यंदा सर्वाधिक 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले आहेत. 5 एप्रिल रोजी प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरही काढण्यात आली. यात 94 हजार 700 बालकांना प्रवेश जाहीर झाले. तयानंतर 12 एप्रिल रोजी दुपारी 3 नंतर संबंधित बालकांच्या पालकांना प्रवेश जाहीर झाल्याबाबतचे “एसएमएस’ही पाठविण्यात आले.
ऑनलाइन प्रवेश अर्जाची स्थिती पाहण्यासाठी बहुसंख्य पालकांनी एकाच वेळी “आरटीई’ पोर्टलला भेट देण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्व्हरच्या क्षमता कमी पडू लागली असून, पोर्टल सुरुच होत नसल्याची बाब उघड झाली आहे. कधीतरी पोर्टल सुरु होते व पुन्हा अचानक बंद पडत असल्याचेही प्रकार घडू लागले आहेत. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र पडताळणी करुन घेण्यासाठी 13 ते 25 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. शाळांमध्ये जावून प्रवेश घेण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी ही मुदत वाढवून द्यावीच लागणार आहे.
केवळ 111 प्रवेश निश्चित
“आरटीई’ पोर्टल व्यवस्थित चालत नसल्याने आत्तापर्यंत केवळ 111 बालकांचे पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळभी करुन प्रवेश निश्चित झालेले आहेत. यात पुणे जिल्ह्यात 33, ठाण्यात 33, पालघरमध्ये 13, मुंबईत 11, औरंगाबादमध्ये 8, यवतमाळमध्ये 6, साताऱ्यात 3, बीडमध्ये 2, गडचिरोलीत 1, रत्नागिरीमध्ये 1 याप्रमाणे जिल्हानिहाय शाळांमध्ये बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यावरुन प्रवेश प्रक्रियेचा वेग खूपच मंद असल्याचे निदर्शनास येत आहे.