नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. 4) त्यांच्या मोदी आडनावाच्या टिप्पणीबद्दल 2019 च्या मानहानीच्या खटल्यात त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. हा निर्णय राहुल गांधी यांच्या राजकीय आयुष्यासाठी फारच महत्वाचा आहे.
कारण आता त्यांची खासदारकी पुन्हा बहाल होऊ शकते आणि त्यांना पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचाही मार्ग मोकळा होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी आणि कॉंग्रेस पक्षासाठीही हा एक उत्साहवर्धक निर्णय मानला जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गटात उत्साहाचं वातावरण आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “काहीही होवा, त्याची पर्वा नाही, मी माझं काम करतच राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करत राहणार, आज नाही तर उद्या, सत्याचा विजय होणारच होता. मला काय करायचं आहे ते मला माहिती आहे.
यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है।
सत्यमेव जयते – जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/wSTVU8Bymn
— Congress (@INCIndia) August 4, 2023
ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचे आभार आणि जनतेने भरभरून प्रेम दिलं, त्यांचंही आभार.’ अशी भावना राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केली. तसेच, काँग्रेसच्या देखील अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. “यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत है। सत्यमेव जयते.. जय हिंद.!’ असं यामध्ये बोललं आहे.