पुणे- सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करावा, असे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी शिक्षण मंडळात बैठक पार पडली. यावेळी आमदार राजकुमार पटेल, प्रभारी शिक्षण आयुक्त राहुल द्विवेदी, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, सहसंचालक दिनकर टेमकर, उपसंचालक वंदना वाहुळ, डॉ. विलास पाटील, रमाकांत काठमोरे, उपायुक्त हारुन अत्तार, मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले, बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक आदी उपस्थित होते.
इयत्ता 10 व 12 वी च्या परीक्षेबाबत विद्यार्थी व पालक यांना लवकर कळविल्यास परीक्षेच्यादृष्टीने तयारी करण्यास सोईचे होईल. राज्यासाठी केरळच्या धर्तीवर एक नवीन “शैक्षणिक चॅनेल’ तयार करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत अतिरीक्त शिक्षकांना सेवा संरक्षण देणे, प्रयोगशाळा सहाय्यक पदाची समायोजन प्रक्रिया थांबविणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी नोकर कपाती बाबतचा शासन निर्णय रद्द करणे, सुधारित आश्वासित त्रिस्तरीय प्रगती योजना लागू करणे, विना अनुदानित शाळा किंवा तुकडीवरील शिक्षक भरती करीता पवित्र पोर्टल प्रणालीतुन सुट देणे, शिक्षकांकरीता वरिष्ठ व निवडश्रेणी लागू करणे.
शिक्षकांचे पगार सी.एम.पी प्रणालीद्वारे करणे, संगणक व टायपिंग अभ्यासक्रमातील परीक्षा-मूल्याकंन पद्धती, सॉफ्टवेअर व इतर महत्वपूर्ण बाबींवर चर्चा व धोरण ठरविणे, बंद करण्यात आलेल्या शासकीय सराव पाठशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन पात्रतेनुसार शासकिय विद्यानिकेतन व इतर ठिकाणी करणे याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.