पुणे -राज्यातील सीबीएसई, सीआयएससीई आणि आता महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यानंतर विद्यार्थी पुढील इयत्ता अकरावी, आयटीआय, डिप्लोमा या प्रवेशाच्या तयारीला लागले आहे.
प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठीही तयारी सुरू आहे. काही विद्यार्थी अकरावी-बारावीपेक्षा आयटीआय आणि पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात. तर, काही जण कृषी शिक्षणाकडेही वळतात.
यंदा सर्वच बोर्डांचा दहावीचा निकाल कमी लागला असला, तरी प्रवेशासाठी स्पर्धा कायमच राहणार आहे. राज्य बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत यंदा 66 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे प्रवेशाचा कटऑफही अधिकच असणार आहे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत.
अकरावी प्रवेश अर्ज भाग-2 दि.8 जूनपासून
महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पद्धत असते. उर्वरित ग्रामीण भागांत महाविद्यालय स्तरावरुनच थेट प्रवेश मिळतो. पुणे व पिंपरी महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशाठी आतापर्यंत 39 हजार 899 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यातील 22 हजार 842 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन अर्ज लॉकही केलेले आहेत. 10 हजार 57 विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो व्हेरिफाइडही झालेले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 8 हजार 620 विद्यार्थ्यांची अर्ज पडताळणी पूर्ण झालेली आहे. 31 अर्ज माघारी घेण्यात आलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी 319 कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी झालेली आहे. प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 11 हजार 665 जागा उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात उद्बोधन वर्गही ऑनलाइन पद्धतीने युट्युबर लाइव्ह आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे देण्यात आली.
‘आयटीआय’साठी दीड लाख जागा
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे. मागील वर्षी सरकारी व खासगी आयटीआयमध्ये 1 लाख 49 हजार 268 एवढा प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश घेण्याकडे अधिकचा कल असल्याचे आढळून आले होते.
‘पॉलिटेक्निक’ प्रवेश अर्ज सुरू
प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज नोंदणीसाठी 21 जूनपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. या प्रवेशासाठी राज्यात 1 लाखापर्यंत जागा उपलब्ध होणार आहेत.