- भविष्यातील कर्जत शहराच्या वाढीव विस्ताराचा विचार करता केलेली धरणातील पाण्याची मागणी पूर्ण होणार का ?
कर्जत : विजय डेरवणकर
कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचा जलसिंचन घोटाळ्याचा मुद्दा विरोधकांनी एवढा गाजवला की या घोटाळ्याच्या आरोपांमुळे तत्कालीन राज्यपालांना याकामात हस्तक्षेप करत धरणाचे काम बंद करावे लागले होते. त्यानंतर कोंढाणे धरण आम्हाला मिळावे, अशी मागणी सिडकोने राज्य सरकारकडे वारंवार केली होती. मागील सेना-भाजप सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाने सिडकोची मागणी मान्य करत धरण हस्तांतरित करण्यास परवानगी दिली. परंतु अद्यापी धरणाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू झालेले नसून, त्यासंबधी आवश्यक त्या सर्व परवानग्या, जमीन संपादन मोबदला याबाबतची सिडकोची प्रक्रिया धिम्यागतीने सुरू आहे, तसेच या धरणाच्या संपादित जमिनीच्या सर्व्हे करण्यासही स्थानिकांचा विरोध होत असल्याने या धरणाचे काम पूर्ण होणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. याच परिसरात सिडकोचा नैना प्रकल्प उभारला जात आहे. या क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या शहराची तहान भागविण्यासाठी सिडकोने कोंढाणे धरणाच्या पाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सरकाकडे तीन वर्ष सातत्याने सिडकोने धरण हस्तांतरणकरीता पाठपुरावा केला आणि त्यांना त्यात यशही आले.
मात्र कर्जतचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी या हस्तांतरणाला तीव्र विरोध दर्शविला आहे. कर्जत तालुक्यातील कोंढाणा धरणाचे पाणी कर्जतलाच मिळावे यासाठी सुरेश लाड आग्रही आहेत. यासाठी त्यांनी मागील काळात आंदोलने, उपोषणे, पायी मोर्चे सुद्धा काढले आणि आजही ते याच आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
तर विद्यमान सेनेचे आमदार महेंद थोरवे यांची भूमिका थोडी वेगळी आहे. भविष्यातील तिसरी मुंबई म्हणून कर्जतकडे पहिले जाते. त्यामुळे या पुढील कर्जतची विस्तार व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साहजिकच पाण्याची मागणीही वाढणार असल्याने त्या दृष्टीने विचार करता कोंढाणे धरणाचे त्या प्रमाणातील टीएमसी पाणी प्राधान्याने कर्जतला मिळावे, असे म्हणणे सरकारकडे मांडले आहे.
तसेच सिडकोला यापूर्वी धरणाच्या कामासाठी झालेला खर्च संबंधित विभागाकडे अदा करावा लागणार आहे. याचबरोबर धरणाच्या आराखड्यात जे मोठे बदल करायचे आहे त्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडून परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
धरणाची पार्श्वभूमी…
आजपर्यंत कोकणात जी धरणे झाली ती पिण्याच्या पाण्यासाठी झाली; मात्र शेतीच्या पाण्यासाठी धरण झालेले नाही, त्यामुळे धरण व्हावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. तत्कालीन राज्यपालांनी मंजुरी दिली, मात्र त्यांनी एक अट घातली होती की लघु पाटबंधारे विभागाने हे धरण घ्यावे. मात्र ही धरण छोटी असतात. आणि हे धरण मध्यम प्रकल्पात मोडत होत. कर्जत तालुक्यातील सालपे येथे ही धरणाच्या कामासाठी सर्व्हे सुरू होता, परंतु गाव मोठं असल्याने पुनर्वसन करण कठीण होत. तर कोंढाणे धरणासाठी नागपंथी ट्रस्टची जागा, सुमारे शंभर एकर खासगी शेतकऱ्यांची जागा आणि काही वनखात्याची होती. त्यामुळे कमीतकमी जमीन शेतकऱ्यांची जाणार होती, पुनर्वसन करणेही सोपे होणार होते आणि पाणी साठवण क्षमता अधिक असल्याने सालपे ऐवजी कोंने धरण मध्यम प्रकल्पात केली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्याकडे वीज निर्मितीसाठी या धरणावर हायड्रो इलेट्रिक प्रोजेक्ट व्हावा, अशी मागणी केली होती, असे धोरण होत. मात्र मधल्या काळात त्यावर बंदी आल्याने सर्व काम थांबलं होत.
सालपे आणि कोंढाणे धरण अशी दोन धरण करण्याऐवजी एकाच एकच कोंढाणे धरण उभारावे आणि त्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवावी लागणार असल्याने त्यासाठी धरणाची उंची वाढवावी, असे पत्र आमदार लाड यांनी दिले.
साहजिकच यामुळे खर्चातही मोठी वाढ झाली.कर्जतची पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन ते रुंद करणाऱ्याचे आणि उंची वाढविण्याचे ठरले तसे पत्र मी दिले त्यामुळे ते धरण मध्यम प्रकल्पात मोडले आणि साहजिकच वाढती रुंदी आणि उंची वाढल्यामुळे खर्चात वाढ झाली. मात्र हा मुद्दा लक्षात न घेता विरोधकांनी धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा खोटा आरोप केला आणि दुर्दैवाने काम बंद पडले आणि आता तेच विरोधक हेच धरण सिडकोला द्यायला निघाले.
माझा आजही सिडकोला पाणी देण्यास तीव्र विरोध आहे. कर्जतचे पाणी कर्जतलाच मिळाले पाहिजे. कारण या धरणाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठा फायदा होणार असून, या बहरलेल्या शेतीचा फायदा जनावरांचा चारा परिणामी वाढते दुभदुभतें यासाठी होऊन दुग्ध व्यवसायिक वाढीस लागेल यात शंका नाही. भविष्यातील कर्जतची वाढती पाण्याची मागणी भागवू शकेल, असे मत माजी आमदार सुरेश लाड यांनी मांडले.
- 1984 मध्ये कोंढाणे धरण प्रकल्पाला मंजुरी मिळूनही प्रकल्प कागदावरच
- 2011 – जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात धरण प्रकल्पहालचाली सुरु झाल्या
- 215.59 हेक्टर खासगी व 261 हेक्टर वनजमीन अशा एकूण 466.59 हेक्टरवर कोंढाणे धरण प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले
धरण वादग्रस्त ठरण्याची कारणे…
- वादातीत फ. ए. एंटरप्राईसेस कन्ट्रक्शन कंपनीला धरण उभारण्याचे काम देण्यात आले.
- वनखात्याची ,पर्यावरणविभागाची परवानगी न घेताच काम सुरु करण्यात आले
- स्थानिक आमदार सुरेश लाड यांच्या मागणीवरून धरणाच्या उंचीत वाढ करून 60 कोटींचे काम अचानक 500 कोटींच्या वर पोहोचले
या धरणाबाबत सर्वपक्षीय आमदारांची, पालकमंत्र्यांची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एक समिती गठीत केली आहे. भविष्यातील तिसरी मुंबई म्हणून कर्जतकडे पहिले जाते. त्यामुळे या पुढील कर्जतची विस्तार, व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साहजिकच पाण्याची मागणीही वाढणार असल्याने त्यादृष्टीने विचार करता कोंढाणे धरणाचे त्या प्रमाणातील टीएमसी पाणी प्राधान्याने कर्जतला मिळावे, असे म्हणणे सरकारकडे मांडले आहे.
– महेंद्र थोरवे, आमदार, कर्जत.