मुंबई – कॉंग्रेसचे आघाडीचे नेते राहुल गांधी यांच्यात देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य नाही,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. लोकमत मिडीयासाठी माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांना दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात सध्या शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यरत असून, त्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या विधानाने गदारोळ माजण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुलाखत घेणारे दर्डा हे कॉंग्रेसचे आणि गांधी कुटुंबाचे एकनिष्ठ नेते मानले जातात. या मुलाखतीत दर्डा यांनी विचारले की, सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.’
राहूल गांधींच्या नेतृत्त्वात कॉंग्रेसची वाटचाल आश्वासक होईल का; या प्रश्नावर पवार म्हणाले की, कोणत्याही नेत्याला त्या पक्षाचे सर्व पातळीवरचे सदस्य, कार्यकर्ते, इतर नेते कसे स्वीकारतात, त्यावर त्या नेत्याचे यशापयश अवलंबून असते. माझे गांधी कुटुंबाशी मतभेद असले आणि मी खूप वर्षांपूर्वीच कॉंग्रेस सोडली असली, तरी आजही कॉंग्रेसमध्ये नेहरु-गांधी परिवाराला मानणारे लोक भरपूर आहेत. कॉंग्रेसच्या विकासात राहूल गांधी अडथळा ठरत आहेत का, या प्रश्नावर पवार यांनी थेट उत्तर देणे टाळले.
याचबरोबर या मुलाखतीत पवार यांनी सांगितले की, अमेरिके माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून राहुल गांधींवर केलेली टीका अयोग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आपल्या देशातील नेत्यांबद्दल काहीही बोलू शकतो. पण, दुसऱ्या देशातील नेत्यांबाबत काही बोलणार नाही. मी इतकंच म्हणेल की, राहुल यांच्यावर ओबामा यांनी केलेली टीका अयोग्य होती.
कृषी कायद्याबाबत उत्तर भारतासह देशभर होत असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहायला हवे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.