पुणे – शिवाजीनगर आणि खडकी परिसरातील रेल्वे प्रशासनाच्या जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही ही अतिक्रमणे जैसे थे आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर आणि खडकी येथील काही रेल्वे जमिनींवर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या जमिनींवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हटवण्यात येणार होते. मात्र, नागरिकांनी अतिक्रमण स्वत:हून हटवण्याचे मान्य केल्याने रेल्वेने कारवाई स्थगित केली होती. परंतु, आता 26 एप्रिलपूर्वी रेल्वे जमिनीवर अतिक्रमण हटवावे, असा इशारा रेल्वेने दिला आहे.
7 एप्रिल रोजी अतिक्रमण हटवण्याचे नियोजन होते. मात्र नागरिकांनी 16 एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याची विनंती केली होती. यानुसार कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. मात्र अद्यापही रेल्वेची जमीन मोकळी न झाल्याने 26 एप्रिल रोजी अतिक्रमण हटकवण्यात येणार असल्याबाबत प्रशासनाकडून नागरिकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, तरीही या नागरिकांनी काहीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसारच ही कारवाई करण्यात येणार आहे.