स्व. अटलबिहारी वाजेपयींच्या काळातील मंजूर काम अजून किती दिवस चालणार
बाळू शिंदे
कापूरहोळ- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) “सुवर्ण चतुष्कोन’ अंतर्गत पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात (2004) मंजूर करण्यात आले. याचा शुभारंभ माजी केंद्रीय वाहतूक मंत्री मेजर जनरल भुवनचंद्र खंडूरी, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी राज्यमंत्री मदनराव पिसाळ आदींनी केला होता. त्यानंतर सहापदरीकरण कामाची सुरुवात करण्यात आली. मात्र, संबंधीत ठेकेदार कंपनी रिलायन्स इन्फ्राकडून सोयीस्कररित्या कामे केली गेल्याने गेली 15 वर्षे हे काम रेंगाळत चालले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचआय) कडून याची दखल घेतली गेल्यानंतर तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी स्वत: या कामाची पाहणी गेल्यावर्षी करून सूचना केल्यानंतर या कामाने काहीसा वेग घेतला. परंतु, ते पुन्हा रखडले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची नेमकी तारीख कोणती? हे आद्यपही कोणत्या मंत्र्यांने जाहीर केलेले नाही.
पुणे-सातारा महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेल्या आठ वर्षांपासून कासवगतीने सुरु आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथील कामाची पाहणी जून 2018 मध्ये केल्यानंतर त्यांच्या आदेशानंतर या कामाने काहीसा वेग घेतला होता. परंतु, या मार्गावर बहुतांशी ठिकाणी अद्यापही काम अपूर्णच आहे. रुंदीकरणाचे अर्धवट काम, अतिक्रमणे, अर्धवट पूल, रस्त्यालगतच टाकण्यात आलेला राडा-रोडा, वाहतूक नियमांसाठी रस्त्यातच उभे केलेले बाबूं, बॅलर, वाळूची पोती, आपत्त्कालीन यंत्रणेचा अभाव… हे चित्र या मार्गावर गेली कित्येक वर्षे पाहायला मिळत आहे.
पुणे-सातारा महामार्गावर गेल्या दोन दिवसात शनिवार (दि.30 ऑगस्ट) आणि रविवार (दि.1 सप्टेंबर) प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनाही ही कोंडी फुटली नाही. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याकरीता सोमवार (दि.2) मध्यरात्र उलटली. गणेशोत्सव तसेच सलग सुट्ट्या आल्या की, या मार्गावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. महामार्गावरील अधर्वट कामे हे यामागचे मूळ कारण आहे. तसेच, पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या गावांत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. परंतु, अनेक ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम झालेले नसल्याने, रस्त्यालगतच वाहने थांबवून हॉटेलात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यासह काहीठिकाणी दुभाजकांत जागा ठेवण्यात आल्याने वाहने मध्येच वळणे, पुढील दिवा लावून विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, असे प्रकारही येथे सर्रास घडत आहेत. ट्रक चालकांचे या मार्गावर जेवणाची हॉटेलं, ढाबे ठरलेली आहेत, असे अप्रशिक्षित चालक सर्व नियम मोडून वाहने जमेल तशी उभी करतात. यातूनच वाहतूक कोंडीसह अपघातही घडत आहेत.
- महामार्गावरील अपघात प्रवणक्षेत्र…
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळा येथील नीरा नदीवरील पुलापर्यंत अपघात प्रवणक्षेत्र आहे, असे म्हणावे लागेल. ससेवाडी, वेळू, कोंढणपूरफाटा, शिवापूरफाटा, वरवे, शिवरे, केळवडे, चेलाडीफाटा, देगाव, कामथडी, कापूरहोळ, धांगवडी, किकवी ही ठिकाणे अपघात प्रवणक्षेत्र सांगितली जातात. हॉटेल व्यवसायिकांनी फोडलेले दुभाजक, दिशादर्शक नसल्याने वाहन चाकांची होणारी फसगत, रिफ्लेक्टर नसल्याने वाहन धडकणे तसेच दुभाजक फोडून जागा केल्याने तसेच रस्त्यावरील बहुतांशी चौकात दिवे नसल्याने अपघात घडत आहेत. - काम पूर्ण नाही, टोल मात्र वाढीव…
मुंबई-बंगळूर महामार्ग हा पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यातून जातो. देशाला चोहोबाजूंनी हा मार्ग जोडल्याने दळणवळण अधिक सोपे झाले तसेच अनेक ठिकाणी औद्योगिक झोन निर्माण झाले. यामुळे या मर्गावर अवजड वाहनांची संख्या वाढत गेली. या महामार्गावर मुंबई पासून बंगळूरपर्यंत अनेक टोलनाके आहेत. चारपदरीचे काम पूर्ण होण्यापूर्वीपासून प्रवाशांकडून टोल घेतला जात आहे. मात्र, एकीकडे सहापदरीकरणात अनेक कामे अपूर्ण असताना दि. 1 एप्रिल 2018 पासून टोलदरही वाढविण्यात आला आहे. वाढीव टोल नेमका कोणत्या कामासाठी असा सवाल चालकांकडून केला जात आहे.