मनातलं व्यक्त होण्याची संधी मिळतेय, त्याबद्दल प्रथम दैनिक प्रभातला मनापासून धन्यवाद. करोनामुळे मानवजातीला हात टेकण्याची वेळ आली आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, इटली, स्पेनसारख्या महासत्ता व प्रगत राष्ट्रे हतबल आहेत. जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या अगोदर मानवाने निसर्गातील विविध घटकांचा अमर्याद वापर केला. आज विकासाच्या नावाखाली वनस्पती, पशुपक्षी, प्राणी आदींच्या अनेक प्रजाती नष्ट केल्या. जगभरात विविध प्रदूषणांची परिसीमा गाठली. मात्र, निसर्गातील अतिसूक्ष्म अशा करोना विषाणूमुळे समस्त मानवजातीला कुठेतरी थांबण्याची वेळ आली आहे. गरजेपेक्षा जे काही अधिक असते, ते विष असते.
हे आता मानवाने समजून घेतले पाहिजे. भारतातील लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा निसर्गाला झाला. मुंबई, पुणे, दिल्ली, लखनऊ, बंगलोर आदी मोठमोठ्या शहरातील प्रदूषणाची पातळी जवळपास निम्म्याने घटली. नद्यांचे पाणी शुद्ध होण्यास मदत झाली. गंगानदी शुद्ध व स्वच्छ करण्यासाठी सरकारने सहा वर्षात करोडो रुपये खर्च केले. परंतु लॉकडाऊनच्या एक महिन्यात गंगानदी आपोआपच प्रदूषण मुक्त झाली. पशुपक्षी, वन्यजीव, जलचर प्राणी आज रस्त्यांवर, शहरांमध्ये, नद्यांमध्ये समुद्रात, आकाशात स्वच्छंदपणे विहार करताना, बागडताना दिसत आहेत.
ओझोन वायूची यापूर्वी झालेली हानी भरून निघत आहे. असे एक ना अनेक फायदे निसर्गाचे, पर्यावरणाचे व अप्रत्यक्षपणे मानवाचेच झाले. पर्यावरणातील वनस्पती, प्राणी, पशुपक्षी, जलचर आदी नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाची आहे. आता आपल्या विलासी जीवनशैलीत बदल करण्याची वेळ आली आहे.
प्रसाद संजयकुमार कर्नावट
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अहमदनगर
संपर्क: 7028285999
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाला स्वतःला समजून घेता आलं तरी आपल्याला आपलं महत्त्व पटणार आहे. कित्येकांनी याचा अनुभव घेतला आहे. आज आपण लॉककडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये आहोत. आज घरात सर्व मंडळी आहेत. आजी-आजोबापासून नातवापर्यंत. अशावेळी आपण एकमेकांशी संवाद साधून नातवांनी आजी-आजोबांना व आपल्या आई-वडिलांना आपला प्रवास कसा झाला, हे जाणून घेतलं पाहिजे या प्रवासाचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यात होईल? का याचा विचार केला पाहिजे. मोबाईल इंटरनेट आणि टीव्ही म्हणजे जीवन नाही.
जीवन जगण्यासाठी माणसाने दररोज पुस्तकाचं एखादं तरी पान वाचलं पाहिजे. आमच्यासारख्या साहित्यप्रेमींना खूप मोठी संधी यानिमित्ताने मिळाली. आम्ही भरपूर वाचन करू शकलो. वाचन हेच जीवन जगायला, माणसं ओळखायला शिकवतं. म्हणून अनेक देशातील नागरिक हातात मोबाईल न घेता पुस्तक घेऊन वाचत असलेले आपल्याला दिसतील. त्यामुळे ते शांत व संयमी राहू शकतात आणि यापुढील काळात हीच खरी गरज आहे.
कारण आपल्या स्वतःला उभे राहायला देशाला परत सुरळीत येण्यासाठी काही महिने जाणार आहेत. त्यावेळी संयम अतिशय महत्त्वाचा आहे. तो संयम आपल्याला महापुरुषांच्या आत्मचरित्र वाचून आपला इतिहास वाचून छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजी राजांचे चरित्र वाचून आत्मसात करता येणार आहे. या पिढीला त्याची अत्यंत गरज आहे
किशोर मरकड
कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, अहमदनगर
संपर्क : 7350553131