Account freeze – आज सकाळी कॉंग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर मोठा आरोप केला. त्यांचे युवक कॉंग्रेसचे जे खाते आहे ते आयकर विभागाने गोठवले अर्थात फ्रीझ केल्याचे कॉंग्रेसने म्हटले. तथापि, खाते फ्रीझ केले नसल्याचे नंतर लक्षात आले.
केवळ चौकशी करण्याची गोष्ट झाली होती व त्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र याच मुद्द्यावरून आज दिवसभरात चांगलेच राजकारण रंगले.
राजकारण बाजूला ठेवले तरी खाते गोठवणे म्हणजे नक्की काय हा प्रश्न त्यामुळे चर्चेत आहे. कोणते खाते गोठवले जाऊ शकते आणि कोणती स्थिती निर्माण झाल्यावर ते गोठवले जाते यावर चर्चा आवश्यक आहे.
जेंव्हा केंव्हा एखादे खाते गोठवले जाते तेंव्हा त्या खात्यावरून सामान्य व्यवहार अर्थात देण्याघेण्याचे व्यवहार करता येत नाहीत. अशा खात्याच्या नावावर जर कोणता चेक दिला गेला तर तो न वठताच परत येईल अर्थात बाउन्स होईल.
खातेधारक आपल्या खात्यामध्ये पैसे टाकू शकतो मात्र त्याला पैसे काढता येत नाहीत. खाते गोठवण्याची अनेक कारणे आहेत. एखाद्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार होणे, कोणत्या गुन्ह्याचा दर्प अथवा शक्यता वाटत असेल तर ते गोठवले जाते.
खाते गोठवल्यावर एटीएममधूनही पैसे काढता येत नाहीत आणि चेक दिला तरी कॅश मिळणार नाही. त्या खात्यात जी काही रक्कम जमा होईल त्यालाही हात लावता येणार नाही. महत्वाचे म्हणजे खाते गोठवण्याच्या संदर्भात अगोदर नोटीस दिली जाणार नाही. खाते गोठवल्यानंतरच ती हातात दिली जाते.