मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले आहेत. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. कॉँग्रेस नेते भाई जगताप यांनी महाराष्ट्रातील काही घटनांवरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
भाई जगताप म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला गेले आहेत. याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. प्रभू राम सर्वांच्या मनात आहेत. आमच्याही आहेत. पण आम्ही त्यांचे कधीही मार्केटिंग केले नाही. त्यांनी खुशाल दर्शनाला जावे. पण त्या आधी महाराष्ट्रात जे रावण बोकाळले आहे त्यांचे काय? त्यांचा आधी बंदोबस्त करा. महाराष्ट्रात सामाजिक अशांतता बिघडवणाऱ्या घटना घडत आहेत. दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा बंदोबस्त करण्याकडे पण लक्ष द्या’, असा टोला भाई जगताप यांनी एकनाथ शिंदे यांना शनिवारी लगावला.
मुंबई काँग्रेसच्यावतीने येत्या 11 एप्रिलला मुंबई काँग्रेसच्यावतीने माहीम ते चैत्यभूमी परिसरात मशाल मोर्चाचे आयोजन केले आहे. यासंदर्भात त्यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती दिली. या मोर्चाला महाविकास आघाडीसह मुंबईतील अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशाला हुकूमशाही पद्धतीने चालवू पाहणाऱ्या केंद्रातील भ्रष्टाचारी भाजप सरकार व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात हा मोर्चा काँग्रेसकडून काढला जाणार जाणार आहे. यावेळी भाई जगताप यांनी भाजपवर सडकून टीका केली.