नंदीग्राम – नंदिग्राम विधानसभा मतदरासंघात एक एप्रिलला मतदान होणार आहे. त्यात प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपाचे सुवेंदु अधिकारी या सर्वोच्च नेत्यांमध्ये टक्कर होणार आहे. दोन्ही उमेदवार आपल्या विजयाची हमी देत असताना डाव्या पक्षांच्या उमेदवार मीनाक्षी मुखर्जी या केवळ नवापुरत्याच उभ्या आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या राजकीय उष:कालाची सुरवातच नंदीग्राममधून झाली. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या ममता यांनी डाव्यांचे दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी यांचा 1980 मध्ये पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यांनी नंतर स्वत:चा तृणमूल कॉंग्रेस हा पक्ष काढला. 2007मध्ये नंदीग्राममध्ये झालेल्या भू संपादनाविरोधात जोरदार आंदोलन उभारले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी डाव्यांना सत्तेवरून हटवले. त्यावेळी राजकीय रणभूमीत सुवेंदु अधिकारी त्यांचे सर्वात विश्वासू साथिदार होते.
ममता यांनी कोलकात्यातील भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्यामुळे त्यानंतर नंदीग्राम हा कधी राजकीय अस्तीत्वाचा किंवा संवेदनशील मतदारसंघ बनला नव्हता. नंदिग्राम हा अधिकारी बंधूंकडेच कायम होता. सुवेंदु हे आमदार होते तर शिशिर हे खासदार होते. डायमंड हार्बर येथील खासदार आणि ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना ममता झुकते माप देत असल्याचा आरोप करत सुवेंदु यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर ममता या मतदारसंघात परत आल्या आहेत.
सुवेंदु अधिकारी यांनी ममता यांना या मतदारसंघात आव्हान दिले आहे. त्यांनी तेथे ताकद पणाला लावली आहे. मात्र भू संपादनाविरोधातील लढ्यातील महत्वाची संघटना भूमि उच्छेद प्रतिरोध कमिटी मात्र ममतांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे चित्र आहे.
आपल्या भाषणात ममता विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत असल्या तरी निवडणुकांच्या आधी तीन दिवस ममता यांना नंदिग्राममध्ये तळ ठोकावा लागला हेही तिकेच खरे आहे. याच टप्प्यात अन्य 29 मतदारसंघातही निवडणुका होत आहेत. हे विसरता येणार नाही. नंदीग्राम मतदारसंघ हा तृणमूल आणि भाजपामधील शह काटशहाचे मुख्य केंद्र बनला आहे. भाजपा तृणमूलवर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वरूपात हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या प्रयत्नात आहे, असे चित्र माध्यमांतून उभे केले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे.
येथे भाजपाने चाणाक्षपणे खेळी केली आहे. त्यांनी येथे सुवेंदु अधिकारी हाच भाजपाचा चेहरा असल्याचे चित्र निर्माण केले आहे. भाजपासाठी प्रचाराची राळ उठवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ममता भूमिपुत्र विरूध्द परके असा प्रचार करण्यास भाग पाडले आहे. तेथेच भाजपाने राजकीय मेख मारून ठेवली आहे. नंदिग्राममधील आंदोलनानंतर ममता कोलकात्यात निघून गेल्या तर अधिकारी बंधूनी येथे आपली पाळेमुळे घट्ट रुजवली आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या रोड शोच्या मार्गावर भाजपाने सुवेंदु अधिकारी यांची पोस्टर्स लावली होती. सोमावारी ममता यांच्या रोड शोला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. त्यामूळे नंदिग्रामच्या मतदारांवरील सुवेंदु यांचा प्रभाव अधोरेखीत झाल्याची कुजबूज भाजपाच्या गोटातून सुरू करण्यात आली. तृणमूल आणि भाजपा दोघेही आपला विजय 50 हजार मतांच्या फरकाने होईल, असा दावा करत आहेत.
नंदिग्राम मतदार संघात दोन लाख 75 हजार मतदार आहेत. त्यात दोन लाख मतदार हिंदू आहेत. त्यामुळे सुवेंदु अधिकारी जय श्रीरामच्या घोषणा देत या मतांच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात आहेत. तर दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी याही मंदिरांना भेटी देत आहेत. अशाच मंदिरभेटीच्या वेळी ममता बॅनर्जी या जखमी झाल्या.त्यानंतर त्यांनी व्हीलचेअरवरून रोड शो केला. हिंदुत्वाच्या या प्रचाराचा परिणाम ममता यांच्या प्रचारावरही दिसून आला त्यांनी आपण हिंदु ब्राह्मण मुलगी असल्याचेर प्रथमच जाहीर केले.
2011 च्या जनगणनेप्रमाणे राज्यापेक्षा नंदिग्रामचा साक्षरता दर अधिक आहे. त्यामुळे बंगालच्या अन्य मतदारांपेक्षा येथील मतदारांना राजकीय माहिती अधिक आहे. त्यामुळे निवडणूकपूर्व मतदार कल चाचण्यांत ध्रुविकरण होण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ममता यांच्या विजयाचा हाच मुख्य भाग आहे, असे मानण्यात येते. या उत्कंठावर्धक लढतीचा निकाल दोन मे रोजी स्पष्ट होईल.