कोलकाता, दि. 21 – पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी डाव्या आघाडीचा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून त्यातही नागरीकत्व दुरूस्ती कायद्याला म्हणजेच सीएएला विरोध करण्यात आला आहे.
डावी आघाडी राज्यात सत्तेवर आली तर पश्चिम बंगाल मध्ये सीएए कायदा लागू केला जाणार नाही, अशी ग्वाही यात देण्यात आली आहे. भाषिक व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचीही हमी यात देण्यात आली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यात नमूद करण्यात आले आहे की, केंद्रातील भाजप सरकारने देशातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावरच हल्ला केला असून धर्माच्या आधारावर नागरीकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोपही डाव्या आघाडीने केला आहे.
राज्यातील सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेसकडूनही धर्माचे राजकारण केले जात असल्याचाही दावा डाव्या आघाडीने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेस व भाजप मध्ये संगनमत असल्याचा आरोपही डाव्या आघाडीकडून केला गेला आहे.