पुणे, मुबंईवरून साताऱ्याला ज्यादा गाड्या; भाऊबिजेला “जिल्ह्यात गाव तिथे एसटी’
सातारा (प्रतिनिधी) –दिवाळीच्या सुट्यांमुळे गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटी फुल्ल झाल्याचे चित्र आहे. गेली दोन दिवस सकाळपासून सर्वच बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. निवडणूक व पावसामुळे गेले काही दिवस जाणाऱ्यांची फारशी गर्दी नव्हती. पण, शुक्रवारपासून ती सुरू झाली असून आठवडाभर ती कायम राहणार असल्याने एसटीने शंभरहून अधिक ज्यादा बस सोडल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त पुणे, मुंबई या ठिकाणी असल्याने दिवाळीला गावाला येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण या गर्दीत जास्त आहे. तसेच कराड, पाटण, वडूज, दहिवडी या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शुक्रवारी सकाळपासून या गर्दीला सुरुवात झाल्यानंतर सातारा बस स्थानकावरही मोठी गर्दी होती. एसटीने सातारा पुणे या मार्गावर नियमीत 58 गाड्या सोडून 78 गाड्या वाढवल्या आहेत. तर पुण्याहून कराडला जाणाऱ्या नियमीत गाड्या सोडून पाच गाड्यांची वाढ करण्यात आली आहे. बोरीवलीहून साताऱ्याला येणाऱ्या सायन व ठाणे या दोन्ही मार्गावर प्रत्येकी 14 अतिरिक्त गाड्या सोडल्या आहेत.
दिवाळीच्या सुट्टीला महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांचा विचार करून एसटी प्रशासनाने पुणे ते महाबळेश्वर जाणाऱ्या 5 गाड्या सोडल्या आहेत. इतर ठिकाणी साध्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्याहून साताऱ्याला येण्यासाठी सर्वात जास्त बस आहे. या गर्दीबरोबर भाऊबीजेसाठी सुद्धा जिल्हा अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने अगोदरच प्रत्येक आगाराच्या पातळीवर गावागावात एसटी गाड्यांचे नियोजन करून मोठी तयारी केली आहे.
चालक, वाहकांनाही अभ्यंगस्नान
दिवाळीच्या हंगामात एसटीच्या चालक व वाहकांना सुट्ट्या मिळत नसल्याने त्यांना अभ्यंगस्नान मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सुर असतो. नेमका याच नाराजीचा विचार करून जिल्हा वाहतूक नियत्रंक सागर पळसुले यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात चालक, वाहकांना अभ्यंगस्नानाची सोय केल्याने कर्मचाऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
प्रवाशांच्या आनंदात भर घालू
दिवाळीच्या हंगामाला पुण्या, मुंबईवरून साताऱ्याला येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मार्गावर तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवाशांच्या सोईसाठी ज्यादा गाड्यांची सोय केली आहे. दिवाळीसाठी येणाऱ्या प्रवाशांच्या आनंदात भर घालण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– सागल पळसुले,
जिल्हा नियंत्रक, सातारा