पिंपरी – ऑटो, टॅक्सी, बस, रिक्षा चालक मालक यांच्या समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लवकरच असंघटित कामगार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून कष्टकर्यांचे कल्याण होणार असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ऑटो, टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन व आठवड्याचे चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या वेळी मंत्री सामंत बोलत होते.
ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या अधिवेशनाला सुरुवात झाली. या वेळी खा. श्रीरंग बारणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी नांदेड येथून नरेंद्र गायकवाड, कराड येथून शिवाजी गोरे आदींसह कल्याण, डोंबिवलीसह महाराष्ट्र आणि देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, असंघटित कल्याणकारी मंडळात रिक्षा चालकांच्या पेन्शनचा, आरोग्य, विमा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वस्त दरात रिक्षा दिली जाणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची सोय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अडचणी सोडवू असे आश्वासन दिले आहे. कष्टकर्यांच्या हातून सन्मान होणे हे महत्वाचं मानतो असे मंत्री सामंत म्हणाले.
बाबा कांबळे म्हणाले की, देशात 45 कोटी बांधकाम मजूर, कंत्राटी सफाई कामगार, घरकाम महिला, फेरीवाले असे संघटित कामगार कष्टकरी आहेत. तर महाराष्ट्रातील 20 कोटी संख्या असणार्या कष्टकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे गरजेचे आहे. संघटनेच्या माध्यमातून त्यांचा आवाज बनून हे काम करत आहोत. ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो चालकांची संख्या देशांमध्ये 25 कोटी असून या घटकांना न्याय देण्यासाठी मी देशभर, तसेच महाराष्ट्रभर फिरत आहे. देशभरामध्ये सर्व एक झाले असून मजबूत संघटन उभे राहिले आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असेन असे बाबा कांबळे म्हणाले.