प्रशांत ढावरे
लोणंद – हरिनामाच्या जयघोषात आणि टाळमृदुंगांच्या गजरात मंगळवारी दुपारी एक वाजता श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. त्यावेळी जिल्ह्याच्यावतीने सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
करोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माउलींचा पालखी सोहळा होऊ शकला नव्हता. यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने सोहळ्या मोठ्या उत्साहात पंढरीकडे निघाला आहे. उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता गृहित धरुन प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सर्व विभागांचा समन्वय साधत वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यास प्राधान्य दिले.
मंगळवारी माऊलींचा सोहळ्याने हैबतबाबांची भूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. नीरा नदीवरील टाळ मृदुंगाच्या गजरात आणि “माऊली माऊली’च्या जयघोषात जलतुषार आणि फुलांच्या वर्षावात प्रसिद्ध दत्तघाट या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल,
आनंदराव पाटील, पुरुषोत्तम जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार दशरथ काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, किरण सायमोते, कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, गटविकास अधिकारी अमिता गावडे, समीर यादव, डॉ. नितीन सावंत, विजयराव धायगुडे, ऍड. गजेंद्र मुसळे, राजेश खरात, उत्तम शिंदे आदींनी पालखी सोहळ्याचे फुलांची उधळण करत स्वागत केले. लोणंद व परिसरात ठिकठिकाणी वैष्णवांचा मेळा विसावला होता. सोहळ्यासाठी पोलिस विभागाच्यावतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करुन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. वारकरी, भाविकांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले.