पुणे : शाळांमध्ये शिक्षक पदभरती होत नसल्याने उमेदवारांनी गेल्या काही वर्षांत डी.एल.एड.च्या प्रवेशाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे प्रवेश होत नसल्याने दरवर्षी अध्यापक महाविद्यालये बंद होत आहेत. यंदाही 13 महाविद्यालयांना कायमचे कुलूप लावण्याची वेळ आली आहे. याबाबतचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (विद्या प्राधिकरण) सादर करण्यात आले आहेत.
शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी डी.एल.एड. अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी उत्तीर्ण होण्याची अट उमेदवारांना घालण्यात आली आहे. त्यातच 2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी होती. आता पवित्र पोर्टलमार्फत टप्प्याटप्प्याने भरती होत आहे. मात्र, डी.एल.एड. करूनही नोकऱ्या मिळत नसल्याने बहुसंख्य उमेदवारांना नोकऱ्यांसाठी इतर पर्यायांचा अवलंब करावा लागत आहे.
दरवर्षी विद्या प्राधिकरणाकडून डी.एल.एड.साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मागच्या शैक्षणिक वर्षात डी.एल.एड.साठी 605 महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यात 33 हजार 374 प्रवेशाच्या जागा होत्या. प्रत्यक्षात यातील 15 हजार 94 जागांवरच प्रवेश झाले. उर्वरित 18 हजार 280 जागा रिक्त होत्या. 2022-23 या शैक्षणिक वर्षात 592 महाविद्यालयांनी नोंदणी केली असून 32 हजार 497 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी आतापर्यंत 4 हजार 732 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.