चिंबळी -गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने खेड तालुक्यातील चिखली, मोशी, मोई, कुरूळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगांव परिसरातील शेतकऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी कांदा, ज्वारी, बाजरी आदी पिकांची लागवड केली. या परिसरातील केटी बंधाऱ्यांमुळे पिकाला पाणीही मुबलक मिळाले; पण सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतात काम करण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.
खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यापूर्वी पेरणी केलेल्या ज्वारी व कांदा पिकाची काढणी करून कमी खर्चात व थोड्या अवधित चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवता येईल या हेतूने चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात शेतकऱ्यांनी गेल्या एक महिन्यापूर्वी उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग पिकाची पेरणी केली; परंतु इंद्रायणी नदीच्या पात्रात शेवळे आणि जलपर्णी वाढू लागल्याने पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खुरापणीची कामे सुरू करून औषध फवारणी करायला लागणार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात असल्याचा अंदाज दिसून आला. या भागात शेतात काम करण्यासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.