नवी दिल्ली – इराणच्या कोम गावात अडकलेले 250 भारतीय नागरिक करोना बाधित झाले असल्याची माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. या प्रकरणी भारत सरकारने आपल्या इराणमधील दुतावासाशी संपर्क करून या भारतीयांना मदत करावी, त्यांची पुन्हा चाचणी घेऊन त्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. भारत सरकारने इराणमध्ये अडकलेले बहुतेक सर्व जण भारतात आणले आहेत असे केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी यावेळी नमूद केले.
पण त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी अजून इराणमध्ये अडीचशे भारतीय अडकले असून त्यांना करोनाची बाधा झाल्याचे नमूद केले. त्यांच्याकडे आता पैसेही नाहीत त्यामुळे त्यांची खाण्यापीण्याचीही मारामार सुरू असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणले. त्यांना भारतात परत आणण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. त्यावेळी आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद असल्याची सबब सॉलिसिटर जनरल मेहता यांनी सांगितली.
ते म्हणाले की, इराण मधील भारतीय दुतावास त्यांच्या संपर्कात असून जेव्हा शक्य होईल त्यांना भारतात आणले जाईल. यावर याचिकाकर्त्याचे वकील आणि सॉलिसीटर यांच्यात कोर्टात बरीच खडाजंगी झाली. त्यानंतर कोर्टाने सरकार या भारतीयांची काळजी घेत आहे, तुम्हाला जेव्हा शंका येईल तेव्हा तुम्ही कोर्टाकडे परत येऊन हा विषय उपस्थित करू शकता असे कोर्टाने याचिकाकर्त्यांना सांगितले.